नवी दिल्ली – सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे देशातील सर्वांत बडा बॅंक घोटाळा उघड झाला आहे. संबंधित प्रकरणी गुजरातमध्ये कार्यरत असणाऱ्या एबीजी शिपयार्ड लि.कंपनीने 28 बॅंकांना तब्बल 22 हजार 842 कोटी रूपयांचा गंडा घातल्याचा संशय आहे. एबीजी शिपयार्ड कंपनीने भारतीय स्टेट बॅंक (एसबीआय), आयसीआयसीआय बॅंक आणि इतर बॅंका, वित्तीय संस्थांची कर्ज योजनांच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा आरोप आहे.
त्यावरून सर्वप्रथम नोव्हेंबर 2019 मध्ये सीबीआयकडे बॅंकांकडून तक्रार नोंदवण्यात आली. त्यावरून सीबीआयने अधिक माहिती मागवली. त्यानंतर ऑगस्ट 2020 मध्ये संबंधित प्रकरणी नव्याने तक्रार दाखल झाली. त्या प्रकरणाची दीड वर्ष छाननी केल्यानंतर सीबीआयने नुकताच संबंधित कंपनी, कंपनीचे माजी अध्यक्ष ऋषी कमलेश आगरवाल आणि काही तत्कालीन संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यापाठोपाठ आरोपींशी संबंधित 13 ठिकाणांवर सीबीआयने शनिवारी छापे टाकले. ती कारवाई गुजरातमधील काही ठिकाणांबरोबरच पुणे, मुंबईतही करण्यात आली. त्या छाप्यांवेळी काही कागदपत्रे हस्तगत करण्यात आली.
संबंधित घोटाळ्यात बॅंकांनी जारी केलेल्या रकमा नियमबाह्यपणे इतर कारणांसाठी वळवण्यात आल्याचे समोर आले आहे. बॅंकांकडून घेण्यात आलेल्या कर्जांची नोंद बुडित म्हणून झाली आहे. एबीजी शिपयार्ड ही जहाजबांधणी उद्योगातील अग्रेसर कंपनींपैकी एक मानली जाते.