मुंबई – औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ व उस्मानाबादचे ‘धाराशिव’ करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला शुक्रवारी केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, कित्येक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या या दोन जिल्हांच्या नामांतरावर अखेर केंद्राकडूूनही शिक्कामोर्तब करण्यात आले.
यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारचे आभार देखील मानले आहेत. तर, दुसरीकडे आता एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. आणि त्यामुळेच आता त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
नुकतंच फेसबुक लाईव्ह येत खासदार इम्तियाज जलील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. उद्या अर्थात शनिवार 4 मार्च पासून छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी 11 वाजेपासून या उपोषणाला सुरवात होणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.
यावेळी ते म्हणाले, “हे आंदोलन लोकशाही पद्धतीने आणि शांततेत असणार आहे. शनिवार 4 मार्च पासून या उपोषणाला सुरवात होणार असून, ते किती दिवस चालेल याबाबत सांगता येणार नाही. हे उपोषण कोणत्याही राजकीय पक्षाच्या अंर्तगत केले जाणार नाही.
तर ज्यांना ज्यांना औरंगाबाद हेच आपल्या शहराचं नाव असावं, असं वाटतं, असे सगळे नागरिक या उपोषणाला येतील. ही फक्त आंदोलनाची एक सुरवात आहे. दिवस आणि रात्र बेमुदत असे हे उपोषण असणार आहे’. असं खासदार इम्तियाज जलील यांनी म्हंटलं आहे.