किशनगंज – अदानी समुहाच्या बिझनेस मॉडेलपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता सगळेच प्रकाशात आल्याने त्या प्रकरणात लक्ष घातले जावे, अशी भूमिका बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना मांडली. त्यामागे भाजप आणि मोदी सरकारला घेरण्याचा उद्देश असल्याचे मानले जात आहे.
अदानी समुहावरून निर्माण झालेल्या वादंगाचे राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. त्या प्रकरणी चौकशी करण्याची आणि संसदेत चर्चा घेण्याची आग्रही मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली आहे. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे गदारोळ होऊन सलग दोन दिवस संसदेचे कामकाज ठप्प झाले. अदानी प्रकरणावरून आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांमध्ये नितीश यांच्या जेडीयूचाही समावेश आहे.