दावडी -शिरूर-भीमाशंकर या राज्यमार्गावरील खेड तालुक्यातील पूर्व भागातील कनेरसर ते पाबळ या मार्गाचे काम रखडल्यामुळे अत्यंत दुरवस्था झाली असून या मार्गाने प्रवास करताना अनेक वाहनचालकाना त्रास सहन करावा लागत आहे.
शिरूर-भीमाशंकर रस्त्याचे काम मागील वर्षी पावसाळ्यापूर्वी कनेरसरजवळ सुरुवात करण्यात आली होती; मात्र अतिवृष्टीमुळे काम थांबविण्यात आले. त्यानंतर केलेले काम पावसामुळे वाया गेले, साईडपट्ट्या खचल्या आहेत, त्यामुळे अनेक प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, या रस्त्याचे काम मध्यतरी पुन्हा सुरुवात करण्यात आले होते; परंतु संथगतीने सुरू असलेले काम काही दिवसात ते बंद झाले असल्याची वस्तुस्थिती आहे. कनेरसर-पाबळ रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
तर चारचाकी व मोठी वाहने चालविणे कसरतीचे आहे, तर दुचाकी वाहनचालकांना जीव धोक्यात घालून व धुळीच्या साम्राज्याचा सामना करून वाहन चालवावे लागत आहे. रस्तेविकास होत असताना वाहतूक सुरक्षिततेवर भर दिला पाहीजे व कामे वेळेवर पूर्ण होण्याचा नियम पाळला पाहिजे; परंतु कनेरसर-पाबळ रस्त्याचे कासवगतीने सुरू असलेले काम पाहून पांढरा हत्ती पोसला जात आहे, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.