नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी चीनी लष्कराशी झालेल्या संघर्षात जखमी झालेल्या भारतीय जवानांपैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे, असे एएनआयच्या वृत्तात म्हटले आहे.
या संघर्षात 20 भारतीय जवान मरण पावले. चीन लष्करासोबत गेल्या पाच दशकातील हा सर्वात मोठा संघर्ष ठरला. लष्कराने सुरवातीला एक अधिकारी आणि दोन जवान मरण पावल्याचे सांगितले होते. या संघर्षात जखमी झालेल्या अन्य 17 जणांनी आपला देह धारातीर्थी ठेवला.
जखमा आणि शून्य अंशाखालील तापमान यामुळे या जवानांचे प्राणोत्क्रमण झाले, असे रात्री उशीरा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. एएनआयने चीनच्या 43 जणांची जीवितजहानी झाली असल्याचे नमूद केले आहे. मात्र भारतीय लष्कराकडून त्याबाबत काहीही सांगण्यात आले नाही.
भारतीय लष्कराच्या निवेदनात हा संघर्ष झाला कसा किंवा दोन्ही बाजूकडून गोळीबार झाला का याबाबत काहीही नमूद केले नाही. मात्र, लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार दोन्ही बाजूने झाला नाही. जखमी झालेले बहुतांश जण दगडफेक आणि चीनी सैन्याने वापरलेल्या रॉडमुळे जखमी झाले आहेत.
भारतीय आणि चीनी सैन्य यांच्यात 15 तारखेच्या रात्री झालेल्या संघर्षात 17 भारतीय जवान गंभीर जखमी झाले. शून्य अंशाखाली असणाऱ्या तापमानात जखमी असतानाही कर्तव्य बजावत ठामपणे उभे राहिल्याने त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. त्यामुळे कारवाईत शहीद झालेल्या जवानांची संख्या 20 झाली आहे. देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मतेसाठी भारतीय लष्कर कटीबध्द आहे, असे लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे.
दुसऱ्या बाजूला चीनने या संघर्षाबाबत भारतालाच दोषी ठरवले आहे. मात्र त्यांनी या प्रकरणावर कोणतेही अधिकृत भाष्य केले नाही. मात्र चीनी लष्कराचा प्रवक्ता आणि सरकारी वर्तमानपत्र ग्लोबल टाईम्स यांनी जीनची जीवितहानी झाल्याचे मान्य केले आहे.