मुंबई- आपण इतके दिवस लॉकडाऊनविषयी बोललो, पण आज मला आपल्याला अनलॉकिंगविषयी बोलायचे आहे. महाराष्ट्राने “मिशन बिगिन अगेन’मधून झेप घेतली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत अल्पावधीतच राज्याने उचललेल्या पावलांविषयी माहिती दिली. राज्यात 16 हजार कोटींची गुंतवणूक होणार असून यातून 14 हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी काही औषधांच्या उपचार पद्धतीस त्वरित मान्यता मिळावी तसेच शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून तातडीने कर्जपुरवठा करण्यासाठी निर्देश द्यावेत, परीक्षांसाठी देशभर एकच सूत्र हवे अशा काही मागण्याही केल्या.
गेल्या दोन-अडीच महिन्यात महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. एकीकडे हा लढा सुरु असतांना आम्ही मोठ्या गुंतवणूकदारांशी करार करून अर्थचक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या प्रारंभी पंतप्रधानांनी लडाख येथील घटनेची माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी दोन मिनिटे स्तब्धता पळून श्रद्धांजली वाहिली.
वैश्विक महामारी करोनाचे संकट सुरु असताना देखील आम्ही नुकतेच 16 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार 12 मोठ्या कंपन्यांसमवेत केले. यामुळे 14 हजार लोकांना रोजगारही मिळणार आहे. या उद्योगांत चीन, अमेरीका, दक्षिण कोरिया, सिंगापूर, अशा देशांचा समावेश आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गेल्या काही दिवसांत राज्यभर करोनाबाधित रुग्णांसाठी सुमारे 3 लाख बेड्सची सुविधा निर्माण केली आहे तसेच फिल्ड हॉस्पिटल्स उभारले आहेत. यावेळी त्यांनी आज लोकार्पण झालेल्या बीकेसी मैदानावरील दुसऱ्या टप्प्यातील रुग्णालयाची तसेच नेसको येथील कोविड रुग्णालयाची छायाचित्रेही पंतप्रधानांना दाखवली. राज्याकडे पीपीई किट्स, एन 95 मास्कची उपलब्धता आहे. मात्र विशेषत: ग्रामीण भागासाठी व्हेंटिलेटर्सची गरज भासणार असल्याचे ते म्हणाले.