नवी मुंबई – नवी मुंबईत अण्णासाहेब मिसाळ यांची स्थगित बदली रद्द करत त्यांच्या जागी नागपूरचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, आयुक्त बदलीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. नवी मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलून पाहा, असा खोचक टोला मनसेने लगावला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी चक्क पालकमंत्री बदलीची मागणी केली आहे. आयुक्त बदलून पाहिले, तसेच पालकमंत्री बदलून पाहा, असे ट्विट त्यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यातील चार महापालिका आयुक्त बदलले.
त्याचवेळी नवी मुंबई पालिकेचे तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांचीही बदली झाली. मग परत दोन दिवसांत बदली रद्द झाली, तर परत मिसाळ यांची बदली होऊन नवीन आयुक्तपदी अभिजित बांगर यांना आणले. सगळे प्रयोग करून पण करोना नियंत्रणात येत नसेल, तर एकदा पालकमंत्री पण बदलून बघा, असे ट्विट काळे यांनी केले आहे.
दरम्यान, याआधी गजानन काळे यांनी महात्मा फुले आरोग्य योजनेवरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला होता. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेला 1 लाख 20 हजार रुग्णांना मोफत उपचार दिल्याचा दावा खोटा आहे, खोटी माहिती देणाऱ्या आरोग्यमंत्र्यांनी जनतेची माफी मागून राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली होती.