पुणे – राज्यात थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे. अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. हॉट सिटी म्हणून ओळख असणारे जळगाव सध्या कोल्ड सिटी झाले आहे. जळगावमध्ये सोमवारी ९.९ अंश तापमानाची नोंद झाली. आता पुढील ३ ते ४ दिवस राज्यात थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मकर संक्रांतीच्या दिवसापासून राज्यात गारठा वाढला आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक शहरांचा पारा उतरला आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नगर व पुणे शहराचा पाराही १० ते १२ अंशांवर दरम्यान होता. संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण सुरू होताच तापमानात वाढ होण्याऐवजी सायंकाळनंतर तापमान घसरणे सुरु झाले आहे. त्यामुळे सध्या कमालीची थंडी जाणवत आहे.
दरम्यान, दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटकमधील हिवाळी पावसाचा जोर संपला. उत्तर भारताकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात ४ ते ५ अंशाने घट झाली. उत्तर भारतात १७ जानेवारीपर्यंत दाट धुके राहणार असून थंडीचा कडाकाही राहणार आहे.
उत्तरेकडूनही थंड वारे आल्याने थंडी
दक्षिण भारतातील ढगाळ वातावरण आणि उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार होऊन किमान तापमानात वाढ झाली होती. दोन दिवसांपासून दक्षिण भारतातील ढगाळ वातावरण निवळले असून उत्तरेकडूनही थंड वारे वाहत असल्याने थंडी वाढली आहे. त्यामुळे किमान तापमानात घसरण झाली आहे.