आळेफाटा- वातावरणातील बदलामुळे साथीच्या रोगांचा प्रादूर्भाव वाढला असून, अनेक ठिकाणी रुग्णांनी दवाखाने भरले आहेत. आरोग्य खात्याने यावर तात्काळ उपायोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
मागील दीड ते दोन महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. ऐन दीपावलीमध्येही थंडीच्या मोसमातही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. दिवाळीनंतर पाऊस उघडल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. धुक्याच्या हजेरीमुळे थंडीचा कडाका वाढेल अशी अपेक्षा होती, मात्र थंडीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा पिकांवर व माणसांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडी तर गायबच झाली आहे; परंतु वातावरणात उष्णता वाढल्यामुळे डेंग्यू, मलेरिया, टायफाईड यांसारख्या साथीच्या रोगांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सध्या या रुग्णांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे.
या परिसरातील जवळपास सर्वच दवाखाने रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यातच डासांचाही उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या डासांना पोषक वातावरण असल्यामुळे डासांच्या उत्पत्तीत वाढ झाली आहे, त्यामुळे रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असून आरोग्य खात्याने याकडे तातडीने लक्ष देऊन त्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.