पुस्तक आणि कॉफीचा मग; रात्री झोपताना आवडत्या पुस्तकाचे वाचन; फावल्या वेळात आवडत्या पुस्तकांची केलेली पारायणे, आवडते शब्द किंवा मजकुराच्या खुणा आणि पुस्तकातले बुकमार्क्स, प्रवासात चाळलेली पाने, नव्या पुस्तकांचा स्पर्श, गंध आणि वाचनाची उत्सुकता, सुट्टीच्या दिवशी केवळ पुस्तक आणि पुस्तक असे चित्र हल्ली दिसत नाही. हातात मोबाईल आल्यामुळे पुस्तक वाचन घटले अशी टीका सातत्याने केली जाते. तरूण पिढी एकीकडे व्हॉटसऍपमध्येच रमते, अशी टीका एका बाजूला होत आहे आणि पुढे अर्थातच “वाचनसंस्कृतीचे काय?’ या विषयावर चर्चा रंगत आहेत.
आजकालचे तरूण वाचनालयाकडे फिरकत नाहीत. त्यांना वाचनाचे कष्ट नको असतात,’ आदी आक्षेप गेली काही वर्षे सातत्याने नोंदवण्यात येत आहे. मात्र त्यावरील उपायांबाबत फारसे काही भरीव घडताना आजही दिसत नाही. तरूणांवर सातत्याने आक्षेप नोंदवण्यात येत असतानाही “ई-बुक्स’पेक्षा “छापील पुस्तकांतच’ समाधान असल्याचे तरूणाई नमूद करते. त्यामुळे छापील पुस्तकांचे वाचन चिरकाल राहील, अशी आशा वाटते.
आजचे लेखक आणि वाचनाचा कल बदलला आहे. कोणतेही साचेबद्ध वाचन करण्यापेक्षा किंवा एकाच प्रकारातील साहित्याचे वाचन करण्यापेक्षा तरुण पिढी विविध प्रकारांची वाट धरत आहे. केवळ वाचनाची माध्यमे बदलली म्हणजे वाचन संस्कृती लयास गेली किंवा वाचनसंस्कृती घटली, असे म्हणणे टोकाचे आणि टीकेचे ठरते. आजची वाचनाची माध्यमे बदलली रात्री झोपताना पुस्तकांची पान चाळण्याऐवजी आज तरूणाई ई-बुक स्क्रोल’ करत आहे.
प्रवासात वाचन करण्याऐवजी तरूणाई हेडफोन्स लावून ऑडीओ बुक्स ऐकत आहे. केवळ मराठी भाषेतील पुस्तकांचे वाचन न करता तरूणाई इंग्रजी भाषेतील पुस्तकांना देखील प्राधान्य देत आहे. त्यामुळे वाचन संस्कृती लोप पावत असल्याचा थेट आरोप न करता, माध्यमे बदलली असल्याचे सर्वांनीच लक्षात घेणे गरजेचे आहे. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी हीच तरूणाई व्हॉटसऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्वीटर या माध्यमांचा वापर करून वाचनसंस्कृती रुजवू पाहत असून, बुक चॅलेंज’ सारखी चॅंलेजेस टॉप ट्रेन्ड’मध्ये आहेत.
21 व्या युगातील या तंत्रज्ञानाबाबत आपण पाठ थोपटून घेतो. परंतु, छापील पुस्तकांकडून ई-बुक्स’, ऑडिओ बुक्स’कडे सुरू असणारा प्रवास मात्र आजही आपल्याला रुचत नाही. 21 व्या युगात आपण तंत्रज्ञानाची वाट न्याहाळल्यास दूरध्वनी ते स्मार्टफोन’ प्रमाणेच छापील पुस्तके ते अपडेटेड’ पुस्तकांचा हा मार्ग देखील अवलंबल्यास माध्यमांचा अडथळा न राहता वाचन संस्कृती ही रुजेल आणि बहरेल, अशी खात्री वाटते.
पुस्तकांचे गाव आणि बुक कॅफे’
वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी आणि अधिक बहरण्यासाठी पाचगणीजवळील भिलार येथे पुस्तकांचे गाव’ ही संकल्पना विकसित झाली आणि पाहता पाहता नागरिकांचा याला तुफान प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे केवळ ग्रंथालयात किंवा घरामध्येच बसून पुस्तके वाचण्याच्या संकल्पनेत बदल होत असल्याचे चित्र दिसू लागले.
इतकेच नव्हे तर, संगीत, खाणे-पिणे आणि मौजमजा असे कॅफे’चे चित्र डोळ्यासमोर येते. मात्र पुण्यातील कोथरूड भागातील बुक कॅफे’ वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी वाटा उचलत असल्याचे दिसत आहे. या कॅफेत नागरिक, प्रामुख्याने तरूणाई “कॅफे’मध्ये बसून पुस्तके वाचत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हे एक सकारात्मक चित्र मानता येऊ शकेल. एकूण काय वाचन संस्कृती जपणे महत्त्वाचे आहे.
मीडिया पर्सोनेल सिद्धी सोमाणी म्हणते…
पुस्तक प्रत्यक्ष हातात घेऊन वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. मी गेली अनेक वर्षे किंडल वापरते. पण पुस्तकांची आवड म्हणून घरातच छोटीशी लायब्ररी केली आहे. आपल्याला पुस्तकांत खुणा करायची सवय असते. महत्त्वाचे काही लिहून ठेवण्याची सवय असते. या गोष्टी किंडलमध्ये शक्य होत नाहीत. प्रत्यक्ष लिहिताना, वाचताना मात्र हाताखाली पाने खेळायलाच हवीत. त्याशिवाय समाधान नाही.
मीडिया स्टुडंट संतोष कसबे म्हणतो…
मेंदूसाठी सर्वात उत्तम आणि पोषक खाद्य म्हणजे वाचन आहे. मानवी जीवनामध्ये वाचनाला अनन्य साधारण महत्त्व आहे. आजची तरुण पिढी ही वाचन करत नाही, अशी टीका केली जाते. पण बदलत्या तंत्रज्ञानामुळे आणि लॉकडाऊनमुळे अनेक तरुण पुन्हा वाचनाकडे वळले. या वाचनाचे स्वरूप हे थोडे वेगळे आहे. पुस्तकांचे झालेले डिजीटलायझेशनमुळे अनेक जण मोबाइलमध्ये पीडीएफ आणि ऑडिओ बुक स्वरुपात वाचन संस्कृती जपत आहेत. किंडलसारख्या ऑनलाईन वाचन माध्यमांची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे “तरुणाई वाचन करत नाही’ या वाक्यात आता जास्त तथ्य नाही.
प्रज्ज्वल खेडकरच्या मते…
मुळात वाचनाची सवय ही सहजासहजी लागणारी नाही. वाचनाची सवय वाचनातूनच लागते. पण त्यासाठी पुस्तक हाती घेऊन, एक जागी बसून, चित्ताची एकाग्रता साधत वाचत बसणे, हे खरेच संयमाचे काम आहे. शिवाय सर्व काही इन्स्टंट हवे, ही मानसिकता रुजवणारी गॅजेट्स आणि इंटरनेटचा प्रचार प्रसार वाढल्याने फारच निकड भासली तरच तरुण पुस्तक हाती घेतात.
वाचनाची कला ही समृद्ध करणारी असली, तरी आज विचारांना समृद्ध करणे केवळ वाचूनच नव्हे तर ऐकून, बघून देखील शक्य आहे, असे आजच्या तरुणांना वाटते. त्यामुळे प्रकाशक आपली पुस्तके अद्ययावत माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत. पूर्वी शालेय पाठ्यपुस्तके किमान तरुण वाचत होते. मात्र आता उदयाला आलेली “ऑडिओ-व्हिज्युअल लार्निंग’ अत्यंत कमी वयातच मुलांना वाचनापासून दूर नेते. पुस्तके खरेदी करणे ही खर्चिक बाब आहे, असा एक समज निर्माण झाला आहे.
लेखिका डॉ. संगीता बर्वे सांगतात…
नव्या पिढीत लहानपणापासून वाचन संस्कृती रुजवली पाहिजे. एकदा पुस्तक वाचनाची सवय लागलेल्या माणसाची वाचनाची सवय कायम राहते. पुस्तक वाचनाबाबत माध्यमे बदलली असल्याचे दिसत आहे. मात्र छापील पुस्तक कायमस्वरूपी व्यक्तीच्या संग्रही रहाते. अनेक ठिकाणी पुस्तक पोहोचत नसल्यामुळे वाचनावर परिणाम होतो.
पुस्तक विक्रेते शैलेश नांदुरकर म्हणतात…
तरूणाई पुस्तकांचे वाचन करत नाही, असे केवळ “म्हटले’ जाते. पण हे चूक आहे. लॉकडाऊनमध्ये नवीन वाचन संस्कृती तयार झाली. सुरूवातीला मोबाइल/गॅजेटसचा वापर झाला. त्यानंतर तरूणांनी प्रत्यक्ष वाचनाला प्राधान्य दिले. तरूणांकडून नव्या पिढीतील लेखकांच्या पुस्तकांना अधिक प्राधान्य असून, ऐतिहासिक, प्रेरणादायी, आत्मचरित्र, चरित्रात्मक पुस्तकांना मागणी आहे.
युवा लेखक अक्षय वाटवे सांगतोय…
लेखन वाचनाचा मुलभूत उद्देश अभिव्यक्त होण्याचा आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या माध्यम बदलाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 21 व्या शतकाच्या तंत्रज्ञान युगात साहित्य प्रकाशनातही माध्यम बदल झाले आहेत. त्यामुळे कदाचित आजचा तरूण तुम्हाला छापील पुस्तक वाचताना दिसणार नाही. पण तोच तरूण ई-बुक्स, किंडलवरील पुस्तके वाचतो; ऑडीओ बुक्स ऐकतो.
वेगवेगळ्या लेखकांचे ब्लॉग, ट्विटर, ब्लॉगिंग साईटस आणि फेसबुकवर व्यक्त होत असतो. आज छापील पुस्तकांची विक्री होत नाही. यासाठी वाचक, लेखक, प्रकाशकांनी एकत्र विचार केला पाहिजे. नवे तंत्रज्ञानाचे मार्ग चोखाळायलाच हवेत. केवळ “नॉस्टॅलजिक’ होवून वाचन संस्कृती टिकणार नाही.
– कल्याणी फडके