अहमदाबाद – फलंदाजीच्या तंत्रात काही बदल केले व त्याचा कसून सराव केला. त्यामुळेच माझ्या धावा होत आहेत व सातत्यही राहात आहे, असे मत भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल याने व्यक्त केले आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सकडून खेळताना गिलने तीन शतके साकार करत सर्वाधिक धावाही केल्या.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी फलंदाजीत काही सुधारणा केल्या आणि तंत्रामध्येही बदल केले. मैदानाच्या बाहेर तुमच्याकडून खूप अपेक्षा ठेवल्या जातात. परंतु, मैदानात असताना तुम्हाला संघासाठी जास्तीत जास्त योगदान द्यावे लागते. मुंबईविरुद्धची शतकी खेळी माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी आहे, असेही गिलने सांगितले.
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यानेही गिलचे कौतुक केले आहे. शुभमनकडे आत्मविश्वास आहे, तो खूप जबरदस्त भरात आहे. मुंबईविरोधात खेळलेली शतकी खेळी त्याच्या सर्वात चांगल्या खेळींपैकी एक होती. तो कधीच घाईत असल्यासारखा दिसला नाही. येत्या काळात तो भारतीय संघाचा सुपरस्टार खेळाडू बनेल, असा विश्वासही पंड्याने व्यक्त केला.