मुंबई: देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना कपडे, अन्न व अन्य साहित्य पुरवठा करण्याकडे केंद्रसरकारचं अक्षम्य दुर्लक्ष होत आहे त्यामुळे कॅगने या सरकारचा बुरखा फाडला आहे अशा शब्दात भाजप सरकारच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
देशभक्तीच्या बाता करून भाजपचे लोक देशातील जनतेची दिशाभूल करत आहे असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. देशाला आता कळून चुकले आहे की, भाजपाचे केंद्रातील सरकार देशाच्या संरक्षणासाठी कुचराई करत आहे. शिवाय सैनिकांची काळजी घेण्याकडेही यांचं दुर्लक्ष आहे. यांना फक्त मतं आणि मतं यापलीकडे या सरकारला काहीच वाटत नाही अशी जोरदार टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.
सियाचीन येथे देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना कपडे, अन्न व अन्य साहित्य पुरवले गेले नाही.केंद्र सरकारचा सैन्यांच्या प्रति अक्षम्य दुर्लक्षपणा यातून दिसून येतो. देशभक्तीच्या बाता करून भाजपचे लोक देशातील जनतेची फसवणूक करत आहेत. खरंतर कॅगने भाजपच्या खोट्या राष्ट्रभक्तीचा बुरखा फाडला आहे.