बीजिंग – भारताबरोबरचा सीमा प्रश्न म्हणजे संपूर्ण द्विपक्षीय संबंध नव्हेत, असे चीनने म्हटले आहे. गैरसमज टाळण्यासाठी आणि गैरअर्थ काढले जाऊ नयेत, यासाठी दोन्ही देशांमधील परस्पर सामंजस्य वाढवण्याच्या गरजेवर देखील चीनने भर दिला आहे.जोपर्यंत सीमाभागात शांतता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत चीनशी द्विपक्षीय संबंध सुरळीत होऊ शकत नाहीत, अशी भूमिका भारताने कायम ठेवली आहे.
जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सीमेवरील सैनिकांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती, तेंव्हापासून दोन्ही देशांदरम्यानचे संबंध बिघडले आहेत. गेल्या चार दशकांमध्ये दोन्ही देशांमध्ये इतका जोरदार संघर्ष झाला नव्हता.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ मोठ्या संख्येने सैन्य एकत्र आणल्यामुळे दोन्हीपैकी कोणत्याही देशाचा फायदा झाला नाही, असेपरराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गेल्या आठवड्यात म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रीया देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेन्बीन यांनी सीमा प्रश्न द्विपक्षीय पातळीवर योग्यरितीने हाताळला जायला हवा, असे म्हटले होते.
मात्र परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सीमेवर इतक्या मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करणे हे दोन्ही देशांच्या हिताचे नाही, अशी प्रतिक्रीया दिली आहे. चीन-भारत सीमेवरील परिस्थितीवर लवकर तोडगा काढणे दोन्ही बाजूंच्या समान हिताचे आहे. असे वेन्बीन यांनीही म्हटले आहे.
पूर्व लडाख परिसरात दोन्ही देशांचे खूप सैन्य आहे, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले. तर चीनकडून संपूर्ण सीमाप्रश्नाच्या अनुषंगाने भाष्य केले आहे. हे दोन्ही मुद्दे प्रत्यक्षात एकच आहेत, असे वेन्बीन यांनी म्हटले आहे.
पूर्व लडाखमधील महत्वाच्या ठिकाणी दोन्ही देशांचे सैन्य आमने सामने आहे. तर अनेक ठिकाणी उच्चपदस्थ आणि लष्करी चर्चेनंतर दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यात आले आहे.