तळेगाव दाभाडे -नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांनी तसेच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवकांनी येत्या आठ दिवसांत शहरातील प्रलंबित विकासकामांना सुरूवात करावी, अन्यथा पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
या मागणीला सत्ताधारी भाजपने प्रतिसाद दिला नाही, तर नाईलाजास्तव नगरपरिषदेचे कामकाज बंद पाडण्यात येईल, असा इशाराही शेळके यांनी यावेळी दिला. आमदार शेळके यांच्या या भूमिकेमुळे मावळ तालुक्यात विकासकामांच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात संघर्ष पेटणार, हे स्पष्ट झाले आहे.
सोमवारी (दि. 6) आयोजित पत्रकार परिषदेला आमदार सुनील शेळके, मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, नगरसेवक गणेश खांडगे, तळेगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश काकडे, नगरसेवक अरूण माने, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, नगरसेविका हेमलता खळदे, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, संगीता शेळके, तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आशिष खांडगे आदी उपस्थित होते.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेत सत्ताधारी भाजपने गलथान, मनमानी व भ्रष्टाचारी कारभार चालविला असल्याचा आरोप आमदार शेळके यांनी केला. आमदारांनी आणलेल्या किंवा शासनाच्या निधीतून कामे नकोत म्हणून नागरिकांना वेठीस धरणे चुकीचे आहे. नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांनी शासनाचा निधी उपलब्ध असलेली विकासकामे सुरू करण्याबाबत आठ दिवसांच्या आत आवश्यक ते ठराव करून कामाचे आदेश काढावेत अन्यथा आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी शेळके यांनी केली.
नगराध्यक्ष व सत्ताधाऱ्यांच्या वाटाघाटीत जनतेला वेठीस धरू नका. विकासकामे करायची नसतील, तर तुम्हाला खूर्ची अडवून ठेवण्याचा कोणताही अधिकार नाही, तुम्हाला कामे करणे शक्य नसेल तर बाजूला व्हा, आम्ही उपलब्ध यंत्रणेत सर्व कामे मार्गी लावून दाखवू, असेही त्यांनी सुनावले. शहरातील अनेक कामांसाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे, मात्र सत्ताधारी भाजपला शहरात कोणतीही विकासकामे होऊ द्यायची नाहीत.
निधी उपलब्ध असताना, निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असताना देखील अनेक कामांचे आदेश काढले जात नाहीत. अनेक कामांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले जात नाहीत. यात सर्वसामान्य जनता भरडली जात आहे, असा आरोप आमदार शेळके यांनी केला. नगरपरिषदेत पूर्णवेळ मुख्याधिकारी नाही, ही सबब पुढे करणारे भाजपच्या पदाधिकारी मुख्याधिकारी नसताना ठेकेदारांचे धनादेश कसे काढू शकतात, असा चिमटाही शेळके यांनी यावेळी काढला.
चुकीच्या व मनमानी पद्धतीने पाणी योजनेचे, भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे.
मैलाजलशुद्धीकरण केंद्राचे काम न करताच आधी शहरातील सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत. खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. त्याबद्दल सत्ताधाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आमदार शेळके यांनी केली. तसेच रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे आतोनात हाल होत आहेत. दिवाळीपूर्वी रस्त्याची कामे पूर्ण होणे शक्य आहे. त्यासाठी येत्या आठ दिवसांत संबंधित कामाचे आदेश सत्ताधाऱ्यांनी काढावेत, अशी सूचना आमदार शेळके यांनी केली.
भाजपकडून अपेक्षाभंग…
तळेगाव नगरपरिषदेच्या इमारतीसाठी 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे, मात्र सत्ताधाऱ्यांना सध्याच्या इमारतीतून कार्यालयाचे स्थलांतर करणेही जमलेले नाही. विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध आहे, मात्र सत्ताधाऱ्यांना प्रस्ताव सादर करणेही जमलेले नाही. मुख्याधिकारी नाही, हेच पालुपद लावून त्यावर खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न ही मंडळी करीत आहेत. मोठ्या अपेक्षेने तळेगावकरांनी भाजपला संधी दिली होती. प्रत्यक्षात त्यांनी अपेक्षाभंग केला. त्याचे फळ येत्या निवडणुकीत त्यांना मिळेल. भाजपचे 3-4 नगरसेवकही निवडून येणार नाहीत, असे भाकित शेळके यांनी केले.
घड्याळ चिन्हासाठी आग्रही – गणेश खांडगे
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढविली जावी, यासाठी आपण पहिल्यापासून आग्रही आहोत, अशी भूमिका पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक गणेश खांडगे यांनी पत्रकार परिषदेत मांडली. तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती किंवा तळेगाव जनसेवा विकास समिती अशा पर्यायांचा वापर करण्याऐवजी थेट पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली गेली, तर शहराच्या अनेक समस्या दूर होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.