पिंपरी, दि. 13 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरवासियांना मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, धरणातून थेट बंद पाइपलाइनद्वारे पाणी आणण्याचा महापालिकेच्या प्रयत्नाला 14 वर्षांपासून खीळ बसली असताना महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे सूतोवाच केले. त्यानंतर मावळातील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पवना बंदिस्त पाइपलाइन प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, अशी मागणी केली आहे. एकीकडे शहरवासीयांना जास्तीचे पाणी मिळावे, यासाठी भाजपचे नेते प्रयत्न करत असताना मावळातील भाजप नेत्यांमुळे शहर भाजप नेत्यांची गोची होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेला मुलभूत सुविधांसह पाणी पुरवठा करणे नाकीनऊ येत आहे. मावळातील पवना धरणातून शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो. महापालिका रावेत येथील पवना नदीवरील बंधाऱ्यातून पाणी उचलून ते प्राधिकरणातील जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द करून शहराला वितरित करते. सद्यस्थितीत 510 एमएलडी पाणी पुरवठा शहराला होत असून सप्टेंबर 2019 पासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. शहराची पाण्याची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. नदीतून पाणी उचलल्यामुळे पाणी कमी होत आहे. पाण्याचा दर्जाही चांगला राहत नाही. बंद पाइपलव्दारे पाणी आणल्यास तब्बल 100 एमएलडी पाण्याची बचत होऊ शकते. याचाच विचार करून महापालिकेने थेट बंद पाइपलाइनमधून पवना धरणातून पाणी आणण्याचे नियोजन केले. यासाठी निविदा राबविण्यात आली. याचे काम मेसर्स एनसीसी इंदू या ठेकेदाराला 2008 मध्ये देण्यात आले. हे काम तेव्हा 398 कोटीमध्ये होणे अपेक्षित होते. या योजनेसाठी निगडी सेक्टर क्र. 23 येथील जलशुद्धीकरण केंद्र ते पवना धरण अशी 34.71 कि.मी. अंतराची जलवाहिनी टाकण्यात येणार होती. शहर हद्दीतील 6.40 किलोमीटर अंतरापैकी 4.40 किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम 2011 ला झाले. शेतकरी आंदोलनामुळे हे काम 9 ऑगस्ट 2011 पासून बंद आहे. मात्र, 12 वर्षानंतर आता पाइपही उकरून काढून टाकण्यात आले आहेत.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ही योजना मार्गी लावण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, मावळात तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे आले असताना भाजपच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा, अशा मागणीचे भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी निवेदन दिले. एककीडे पिंपरी-चिंचवड भाजपचे नेते शहराला वाढीव पाणी कसे मिळेल, यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच शहराच्या दृष्टीने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प महत्वाचा आहे. हा प्रकल्प मार्गी लागावा, अशी शहर भाजप नेत्यांची इच्छा आहे. मात्र, मावळातील भाजप नेत्यांच्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या विरोधामुळे शहर भाजप नेत्यांची मात्र कोंडी होत आहे.
आंद्रा, भामा-आसखेड धरणातून 267 एमएलडी पाणी
पवना धरणाव्यतिरिक्त शहरासाठी आंद्रा धरणातून 100 एमएलडी आणि भामा आसखेडमधून 167 एमएलडी असे 267 एमएलडी पाणी आणण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. आंद्रा धरणातून पहिल्या टप्प्यात पाणी आणण्याचे पालिकेचे नियोजन आहे. याचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. नोव्हेंबर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत आंद्रा धरणाचे पाणी शहरवासीयांना मिळेल, असा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, 15 तारीख अगदी जवळ आलेली असतानाही अतिरिक्त पाणी पुरवठा सुरू होण्याची चिन्हे अजून दिसत नाहीत. अतिरिक्त पाण्यासाठी वारंवार मिळणाऱ्या तारखांमुळे शहरवासीय मात्र नाराजी व्यक्त करत आहेत.