मुंबई –आयपीएल स्पर्धेच्या पुढील वर्षीच्या मोसमासाठी बीसीसीआय व आयपीएल समितीने काही नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यात प्रामुख्याने खेळाडूंसाठी असलेला रिटेनचा नियम तसेच राईट टू मॅच कार्डचा नियम काही प्रमाणात बदलला जाणार आहे.
2022 सालच्या मोसमात होणाऱ्या आयपीएलच्या महालिलावात याच नियमांनुसार खेळाडू निवडले जातील. त्याच वर्षीपासून आयपीएलमध्ये दोन नवे संघ दाखल होणार असून ही स्पर्धा 10 संघांमध्ये खेळवली जाणार आहे. याबाबतच्या प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्येक संघाच्या रिटेन पॉलिसीबद्दल म्हणजे खेळाडूंना संघात कायम ठेवण्याबद्दलच्या नियमांत बदल करण्यात आला आहे.
नव्या दोन संघांनादेखील बड्या खेळाडूंना संघात खरेदी करता यावे यासाठी आता अस्तित्वात असलेल्या संघांना केवळ तीन खेळाडूंनाच संघात रिटेन करता येणार आहे. तसेच, राईट टू मॅच हे कार्ड कालबाह्य करण्यात येणार आहे, अशी चर्चा आहे.
प्रत्येक संघ आपल्या संघातील खेळाडूंसोबत एका मोसमात खेळतो. त्यानंतर पुढील मोसमासाठी प्रत्येक संघाला 4 खेळाडूंना आपल्या संघात कायम ठेवण्याचा अधिकार असतो. सुरू असलेल्या मोसमातील स्पर्धा पूर्ण होण्यापूर्वीच या चार खेळाडूंना लिलाव होण्याच्या आधीच करारबद्ध करणे याला रिटेन पॉलिसी म्हणतात.
त्यानंतर करारमुक्त केलेल्या खेळाडूंचा लिलाव केला जातो. त्यातील एखाद्या खेळाडूवर बोली लावली जाते. त्याच बोलीवर एखादा खेळाडू जुन्या संघाला खरेदी करायचा असल्यास त्यावेळी राईट टू मॅच हे कार्ड वापरता येते. हे कार्ड तीन वेळाच वापरता येणार आहे. एखाद्या संघाने एखादा खेळाडू करारमुक्त केला.
त्यानंतर लिलावात दुसऱ्या संघाने त्याच्यावर काही रकमेची बोली लावली आणि त्याला खरेदी केले. तर त्यावेळी आधीच्याच संघाला तो खेळाडू हवा असल्यास तितक्याच किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची बोली लावत आपल्या संघात घेतले जाते यालाच राईट टू मॅच कार्ड असे म्हटले जाते.
करोनाबाबतचे नियम अद्याप कायम
आयपीएल स्पर्धेच्या करोनाबाबतच्या नियमांचे पालन खेळाडूंना व संघांना करावेच लागणार आहे. यानुसार अमिरातीत होणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या सामन्यात फलंदाजाने मारलेला षटकार स्टॅंडमध्ये गेला तर दुसरा चेंडू वापरला जाणार आहे. गोलंदाज चेंडूची चमक टिकवण्यासाठी लाळेचा वापर करू शकणार नाही. जर एखाद्या खेळाडूने लाळ लावल्याचे सिद्ध झाले तर पंच त्याला पहिल्यांदा तंबी देतील. पण पुन्हा त्याच्याकडून अशी चूक घडली तर त्या खेळाडूला मोठा दंड करण्यात येणार आहे व प्रतिस्पर्धी संघाला 5 धावाही बहाल केल्या जातील.