नवी दिल्ली – राज्यात आणि देशभरात सध्या धार्मिक वाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यावरून वाद सुरू झाल्यानंतर याचं लोण संपूर्ण देशात पसरला. यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबईतील टिळक भवन येथे ते पक्षाच्या बैठकीत बोलत होते.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. देश ५० वर्षे मागे गेला आहे. केंद्र सरकारचे अपयश झाकण्यासाठीच भाजपकडून धार्मिक मुद्दे पुढे करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.
दरम्यान भाजपच्या षडयंत्राला बळी न पडता मोदी सरकारचे अपयश समोर आणण्याचं आवाहन पटोले यांनी केलं. ते पुढं म्हणाले की, काँग्रेस पक्ष सर्वात जुना व अनुभवी पक्ष आहे. काँग्रेसला माननाऱ्यांची संख्या राज्यात मोठी आहे. या लोकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे. डिजिटल सदस्य नोंदणीच्या माध्यमातून घरा-घरात जाऊन लोकांना काँग्रेसशी जोडा. आतापर्यंत झालेली सदस्य नोंदणी समाधानकारक असली तरी अजूनही काही भागात सदस्य नोंदणीवर भर देण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं.