लग्न, गणपती मिरवणुका, जयंतीचा मुहूर्त हातचा गेला
करोनामुळे सुपारीच न फुटल्याने चिंताग्रस्त
पुणे – लग्न, गणपती मिरवणुका, जयंती आदींच्या निमित्ताने बॅन्ड धून हमखास ऐकायला मिळते. मात्र, यंदा करोनामुळे बॅन्ड पथकांचा आवाज “म्यूट’च आहे. त्यामुळे दरवर्षी बॅन्ड पथकांमध्ये वादन करणाऱ्या कलाकारांवर उपजीविकेसाठी अन्य काम करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता वादकांना गणेशोत्सवात किमान स्थिर वादन करायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
वराती, मिरवणुका, धार्मिक कार्यक्रम आदींना पारंपरिक बॅन्ड पथकांमुळे वेगळाच साज चढतो. बॅन्डच्या अनोख्या ताला सुरामुळे मंगल कार्यांची शोभा अधिकच वाढते. साधारण नोव्हेंबर, डिसेंबर, मार्च, एप्रिल, मे या महिन्यांसह गणेशोत्सव, नवरात्र या सणांमध्ये कार्यक्रमांचे प्रमाण अधिक असते. याशिवाय केवळ शहरातच नव्हे तर, जिल्ह्यासह राज्यभर लग्नसराईच्या निमित्ताने पथके वादन करतात. या कालावधीत पथकांची आर्थिक उलाढाल लाखोंच्या घरात असते.
मात्र, लॉकडाऊनमुळे लग्न, मिरवणुकांवर निर्बंध आले. त्यामुळे यावर्षी बॅन्ड पथकांच्या कार्यक्रमांच्या सुपाऱ्या फुटल्याच नाहीत. त्यामुळे पथकांतील वादक आणि मालकांमध्ये पुढील काळाची चिंता सतावत असून, अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
देखभाल खर्च वाढणार
एका पथकामध्ये ट्रम्पेट, इफोनियम, क्लोरोनेट, सिंथेसायझर, ड्रम आदी वाद्ये वाजवणारे किमान 25 वादक कलाकार असतात. तर या पथकांमध्ये वादकांना तासावर मानधन देण्यात येत असून, प्रत्येक वादकाला किमान चारशे रुपयांप्रमाणे मानधन देण्यात येते. याशिवाय, वाद्य एका ठिकाणी राहिल्यास वाद्यांची बटणे खराब होण्याची शक्यता असते. तोंडाने वाजवण्यात येणाऱ्या वाद्येदेखील खराब होऊ शकतात, त्यामुळे बॅन्ड पथकांना आगामी काळात वाद्यांच्या देखभालीसाठी खर्च करावा लागणार आहे.
करोना पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांतील वादन रद्द झाले. गणेशोत्सवात आमच्या पथकाचे मुख्य वादन दगडूशेठ गणपती मिरवणुकांमध्ये होते. मात्र, यंदा त्याबाबतदेखील साशंकता आहे. सध्या कोणत्याही कलाकाराचे वादनाचे काम नसल्याने काहीजण रिक्षा चालवणे, मजुरीसह काही व्यवसाय करत आहेत.
– इक्बाल दरबार, दरबार बॅन्ड