मुळचे मुळशीतील कुळे येथील पण पुण्यातील कर्वेनगर येथे देताहेत सेवा
पिरंगुट- लॉकडाऊनमुळे पुण्यातील अनेक निराधार कुटूंबे, मोलमजूर, विद्यार्थी यांना स्वयंसेवी संस्थामार्फत अन्नदान केले जात आहे. तथापी कर्वेनगर येथील संगीता आणि शशिकांत किसन साठे हे दाम्पत्य मानवतेच्या भावनेतून तब्बल 275 भुकेलेल्यांची पोटाची खळगी भरत आहेत. दररोज पहाटे उठून साठे दाम्पत्य आणि त्यांची दोन्ही मुले दुसऱ्यांची भूक शमविण्यासाठी धडपडत आहेत. अवघी दहावी, बारावी झालेल्या साठे दाम्पत्याच्या अन्नदानाचा दानशूरपणा कोथरूड परिसरात सध्या कौतुकाचा विषय झाला आहे.
अवघे बारावीपर्यंत शिकलेले शशिकांत मूळचे कुळे (ता. मुळशी) येथील आहेत. उपजिविकेसाठी 23 वर्षांपूर्वी ते पुण्यात आले. शुक्रवारपासून (दि. 20) हे दाम्पत्य दुपारी सुमारे 75 आणि रात्रीच्यावेळी 200 भुकेलेल्यांना जेवण पुरवितात. दोघेही पहाटे उठून जेवणाचे नियोजन व तयारी करतात. मुले साहिल आणि श्रृतीदेखील आईबाबांनी याकामी मदत करतात. चार पुऱ्या, भाजी, पुलाव किंवा मसालेभात, पापड, लोणचे आदि भरून त्याची पाकीटे तयार करतात. दुपारी एकच्या सुमारास नळस्टॉप, मृत्यूंजय मंदिर तसेच वारजे पुलाखाली बसलेल्या निराधार गरजूंना जेवणाची पाकीटे वाटतात. तर रात्रीच्यावेळी त्यांच्या घरून सुमारे 200 गरजू जेवणाची पाकीटे घेवून जातात. वाटपावेळी करोनाच्या संसर्गाची बाधा होवू नये यासाठीही त्यांनी योग्य ती काळजीही घेतली आहे. जेवणाच्या एका दिवसासाठी त्यांचा सर्वसाधारण नऊ हजार रूपये खर्च होतो. जेवणाअभावी कुणी उपाशी राहत असेल तर त्यांनी 9623311557 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.