पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून शहरात रोजच आंदोलने होत आहेत. अनेकदा एकाच दिवसात दोन किंवा तीनहून अधिक आंदोलने शहरात होत आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा या प्रत्येकासाठी मुलभूत गरजा मानल्या जातात. यापैकी अन्न मिळविण्यासाठी व्यवसाय करु द्या आणि निवारा असलेले घर नियमित करा किंवा झोपडपट्टीवासियांना घर द्या, अशा मागण्यांसाठी शहरात आंदोलने होताना दिसत आहेत. एकंदरीत शहरातील नागरिकांमध्ये खदखद वाढत असल्याचे चित्र वाढत्या आंदोलनांवरुन दिसून येत आहे.
लॉकडाऊनचे नियम शिथील केल्यानंतर आंदोलन, निदर्शने व मोर्चांचे प्रमाण वाढले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरीकरणाने वेग घेतल्यानंतर नागरी समस्यादेखील त्याच वेगाने वाढू लागल्या आहेत. आज शहराची लोकसंख्या 25 लाखांवर पोचली आहे. परिणामी या समस्यांची तीव्रतादेखील आता वाढू लागली आहे. शहरातील आंदोलनाचा चौक अशी ओळख असलेल्या पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाने करोनाकाळात मोकळा श्वास घेतला होता. परंतु आता पुन्हा आंदोलनांची धग या चौकाला जाणवू लागली आहे.
गुरुवारी पीपल्स रिपब्लिकन पार्टीने संग्रामनगर झोपडीधारकांना घर मिळावे, रेड झोनमधील बांधकामे अशा काही मागण्यांसाठी निगडी ते महापालिका भवन असा आक्रोश मार्च काढला. दुसरीकडे पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात स्वाभिमानी संघर्ष घर बचाव चळवळ या संघटनेने घरे नियमित करावी आणि शास्ती कर माफ करावा, या मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले. तहसील कार्यालयासमोर एका संघटनेने रिक्षा चालकांना अनुदान मिळावे, यासाठी आंदोलन केले. तर बुधवारी कष्टकरी कामगार पंचायतीने एमआयडीसी कार्यालयासमोर पथारी व्यावसायिकांना पोट भरण्यासाठी व्यवसाय करु द्या, त्यांच्यावर कारवाई करु नका, या मागण्यांसाठी आंदोलन केले.