पुणे : कात्रज प्राणी संग्रहालयातील ४ काळविटांचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे.
पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय येथील काळवीटांवर झालेल्या हल्ल्यामुळे निष्पाप प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, गेल्या वर्षी म्हणजेच सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे प्राणिसंग्रहालयात सर्वत्र पाणी साचले होते. साचलेल्या पाण्याला वाट करून देण्यासाठी त्यावेळी प्राणी संग्रहालयाची भिंत पाडण्यात आली होती. परंतु त्यानंतर मात्र त्या भिंत पूर्णपणे बांधण्यात आली नव्हती. याचाच फायदा घेत भटकी कुत्री त्या वाटेने आत आली आणि त्यांनी त्याठिकाणी असलेल्या काळवीटांवर प्राणघातक हल्ला केला.
या घटनेनंतर तात्काळ भिंत पूर्णपणे बांधण्याचे आदेश देण्यात आले असून ५ पैकी ४ कुत्र्यांना देखील पकडण्यात आले आहे.