स्वच्छ सर्वेक्षण मोहीम : तीन महिन्यांनी होणार स्वच्छतेचे रॅंकिंग
पुणे – स्वच्छ भारत अभियानांतर्गत मोठ्या शहरांचे स्वच्छता रॅंकिंग निश्चित केले जाते. यासाठी घेण्यात येणारी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा आता प्रत्येक तीन महिन्यांनी होणार आहे. त्याअंतर्गत एप्रिल ते जून या पहिल्या सर्वेक्षणाची सुरुवात झाली असून याअंतर्गत शहरातील 48 नागरिकांकडून केंद्रशासन शहर स्वच्छतेची माहिती फोनवरून घेणार आहे. या नागरिकांच्या उत्तरावर महापालिकेच्या शहर स्वच्छतेच्या गुणांकनाची भिस्त असणार आहे.
गेल्या तीन वर्षांत स्वच्छ शहर स्पर्धेत पहिल्या दहामध्ये असलेली पुणे महापालिका थेट 37 व्या क्रमाकांवर गेली आहे. या धक्क्यातून महापालिका प्रशासन सावरत असतानाच; आता केंद्राकडून संपूर्ण वर्षात प्रत्येक तीन महिन्यांनी शहर स्वच्छतेचे रॅकिंग केले जाणार असून या रॅकिंगच्या सरासरी गुणांवर शहराचा देशातील स्वच्छ शहराचा क्रमांक ठरणार आहे. त्या अनुषंगाने केंद्राकडून या स्पर्धेत वेगवेगळे बदल करण्यात आले असून यंदापासून पहिल्यांदाच शहरातील नैसर्गिक जलस्रोत, सांडपाणी व्यवस्थापन, नदी स्वच्छता या घटकांचाही या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने महापालिकेकडून पहिल्या टप्प्यातील या स्पर्धेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तसेच शहर स्वच्छतेची सद्यस्थिती केंद्राला अहवाल स्वरूपात पाठविली असून लवकरच केंद्राचे पथक शहराच्या पाहणीसाठी येणार आहे.
याशिवाय, उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शहरातील 48 नागरिकांना फोन कॉल करण्यात येणार असून वेगवेगळ्या 11 स्वरूपाच्या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांच्याकडून शहर स्वच्छतेचा आढावा घेतला जाणार आहे. हे नागरिक कोण असतील, त्यांना केव्हा फोन केले जातील, याची कल्पना कोणालाही नसेल. त्यामुळे नागरिक काय अभिप्राय देतील, यावरही गुणांकणात मोठी भर अथवा घट होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले.