नवी दिल्ली – फेसबुकवरून भाजपच्या प्रचाराच्या मुद्दयावरून संसदेच्या माहिती तंत्रज्ञान विषयक स्थायी समितीच्या सदस्यपदावरून कॉंग्रेस नेते शशी थरूर यांना हटवण्यात यावे, अशी मागणी या समितीवरील भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेच्या सभापतींना पाठवलेल्या पत्रात केली आहे. थरूर यांनी लोकसभेच्या कामकाजाच्या नियमांचा भंग केला आहे, असा आरोप दुबे यांनी केला आहे.
संसदेच्या कामकाजाच्या नियम क्रमांक 283 आणि 258 (3) नुसार थरूर यांचे वर्तन संसदीय समितीच्या अध्यक्षांप्रमाणे नाही. त्यामुळे माहिती अधिकार विषयक स्थायी समितीच्या कोणत्याही बैठका थरूर यांनी बोलावू नयेत. थरूर यांना या समितीवरून हटवण्यात यावे, अशी मागणीही दुबे यांनी केली आहे.
सोशल मिडीयावर अनेक खोट्या आणि एकतर्फी बातम्या येतात. त्याचा लोकांच्या खासगी आयुष्यातही शिरकाव केला जातो. भाजपने कधीही कोणत्याही प्रसिद्धी माध्यमाला झुकते माप दिलेले नाही. मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांप्रमाणेच सोशल मिडीयाचेही नियंत्रण केले जायला पाहिजे, असे आपण संसदेतच म्हटलेले असल्याची आठवण दुबे यांनी करून दिली.
कालच दुबे यांनी संसदेच्या “आयटी पॅनेल’चे अध्यक्ष शशी थरूर आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीसही दिली आहे.