मुंबई : आपली करोनासोबतची लढाई सुरूच आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत वाढवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना धन्यवाद दिले आहेत. परिस्थिती कितीही आपल्या हातात आली असली नसली तरीही आपण हा लढा गांभीर्याने घ्यायला हवा आणि आपल्या सगळ्यांच्या एकजुटीनेच आपण नक्की जिंकणार आहोत हा आत्मविश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
राज्यातील नागरिकांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी आज संवाद साधला.
महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढले आहेत. राज्यात सर्वाधिक चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. करोनाची लागण झाली म्हणजे सगळे काही संपले असे नाही. वेळेवर उपचार झाल्यास सहा महिन्याचे बाळ करोनाला हरवू शकते, याचे उदाहरण महाराष्ट्रात घडले आहे. त्यानंतर 83 वर्षांच्या आजींनीही करोनावर मात केली आहे, हे नागरिकांनी लक्षात घ्यायला पाहिजे.
ही लढाई आणखी प्रखरपणे लढण्यासाठी डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला आहे. हे काय करणार तर ट्रिटमेंटची गाईडलाईन ठरवणार आहेत. यामध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टर आहेत. काही खासगी क्षेत्रातले डॉक्टर आहेत. एक चांगले काम या टीमने सुरू केले आहे. मुंबईत 20 ते 22 हजार चाचण्या झाल्या. कोविड आणि नॉन कोव्हिड अशी आपण रुग्णालयांची विभागणी करतो आहे.
करोनाची लागण झालेली व्यक्ती सापडली की त्यांच्या थेट संपर्कातल्या लोकांना क्वारंटाइनमध्ये ठेवले जाते आहे. त्यांच्यापासून प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेतली जाते आहे. काही वेळा गैरसोय होते मात्र ती लवकरात लवकर दूर करुन आपण जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु केला आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
करोनाचे संकट संपल्यानंतर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्या संकटाचा सामना करण्यासाठी माझे सगळेच सहकारी काम करत आहेत. 20 एप्रिलनंतर काय करायचे याची तयारीही सुरू आहे. हे जे संकट आहे त्याला धीराने तोंड देण्याची गरज आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही असंही उद्ध ठाकरे यांनी स्पष्ट केले.