मुंबई – राज्यात सत्तांतराला वर्षपूर्ती झाली असून महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्याने करण्यात आला आहे. शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात उद्या मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारभारातील भ्रष्टाचाराच्या विरोधात महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.
मुंबई महापालिकेत वर्षभरापासून नगरसेवक नाहीत. मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात आहे आणि त्यामुळेच मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात हजारो कोटी रुपयांचे घोटाळे होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वेळोवेळी करण्यात आला आहे.
रस्ते कॉंक्रिटीकरण घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा किंवा मग खडी घोटाळा याबाबतच्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात आला आहे. या मोर्चात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे हे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मुंबईकरांना संबोधित करणार आहेत. दरम्यान, या मोर्च्याला अद्याप पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही. पण तरी देखील हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
महायुतीही देणार प्रत्युत्तर
या मोर्च्याला आता महायुतीकडून प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. “चोर मचाये शोर’ असा नारा देत भाजपकडून या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या या मोर्च्यामध्ये शिवसेना आणि रिपाईचे कार्यकर्ते देखील सहभागी होणार आहेत, अशी माहिती भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिली.