नवी दिल्ली: पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील सर्व दहशतवादी अड्डे आणि 15 ठाणी सध्या पूर्ण भरलेली आहेत. त्यामुळेच सीमेवरून घुसखोरीच्या प्रयत्नांमध्ये आणि जम्मू काश्मीरमधील घातपाताच्या कारवायांमध्ये मोठी वाढ संभवते असे श्रीनगरमधील 15 कॉर्प्सचे कमांडर म्हणून 1 मार्चपासून जबाबदारी असलेले लेफ्टनंट जनरल बी.एस. राजू यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
जम्मू काश्मीरमधील दहशतवादाचा कणा पार मोडला आहे. काश्मिरींना शांतता अनुभवायला मिळते आहे. तसेच जम्मू काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्था खूपच सुधारली आहे, हे पाकिस्तान पचवू शकत नाही. जम्मू काश्मीरमध्ये एकापाठोपाठ एक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. त्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहे. ही कमी भरून काढण्यासाठी या उन्हाळ्यामध्ये घुसखोरी करून आणखी दहशतवादी घुसवण्याचा कट असू शकतो. त्यामुळे आगामी काळात घुसखोरीचे आणखी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. कारण केवळ उन्हाळ्यातच घुसखोरी जरा सुसह्य असू शकते, असे ले.जन. राजू यांनी सांगितले.
पाकव्याप्त काश्मीरमधील सर्व दहशतवादी अड्डे आणि सुमारे 15 तळ पूर्ण भरले आहेत. हे दहशतवादी पाक सैन्याच्या मदतीसाठी घुसखोरी करण्यास आतूर झाले आहेत. पाक सैन्याकडून या अशा घुसखोरीला गेल्या 30 वर्षांपासून मदतच केली जात आहे. यापूर्वीही घुसखोरीला मदत व्हावी, म्हणून पाक सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले गेले आहे. मात्र भारतीय लष्कराच्या सडेतोड प्रत्युत्तरामुळे त्यांचे हे कारस्थान निष्प्रभ ठरले आहे, असेही ले.जन. राजू म्हणाले.
कोविड-19 च्या साथीच्या पार्श्वभूमीवर या घुसखोरीचा सामना कसा केला जातो, असे विचारले असता पाकिस्तानच्या दृष्टीने कोविड-19 पेक्षा काश्मीरमधील शांतता ही मोठी समस्या आहे. त्यामुळे तशाही परिस्थितीत घुसखोरी चालू ठेवली जाते. सीमेवरील भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे, असे राजू म्हणाले.
बंदी घातलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी गटाचे स्वत: ची कमांडर नुकत्याच झालेल्या रियाज नाईकू आणि जुनैद अशरफ शेराई यांच्यासारख्या दहशतवादी म्होरक्यांच्या हत्येनंतर आता या दहशतवादी गटाकडे नेतृत्वाचा अभाव राहिला आहे. पाकिस्तानी सैन्याकडूनच आता दहशतवाद्यांना थेट मार्गदर्शन केले जात आहे. नेतृत्व नसल्यामुळे जम्मू काश्मीरमधील दहशतवादी गटांना केवळ स्वतःचे अस्तित्व वाचवायचे आव्हान उरलेले आहे, असेही ते म्हणाले.