खडकवासला – पुण्यातून फिरायला पानशेतला आलेल्या पुण्याच्या पर्यटकाचा अपघात होवून दुर्दैवी अंत झाला. पानशेत खोऱ्याचे सौंदर्य पाहण्यासाठी आपला पती व मुलासोबत पर्यटनासाठी महिला आली अन् जीवाला मुकली आहे.
कारचा टायर फुटल्याने कादवे गावच्या स्मशानभूमी जवळ स्वातंत्र्यदिनी ( दि.१५) पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील पर्यटकांची कार दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पानशेत धरणात कोसळून झालेल्या दुर्घटनेत महिलेचा बुडून दुर्दैवी मुत्यु झाला.
कार चालक पतीने प्रसंगाधान दाखवत स्वतःचे व मुलाचे प्राण वाचवले. मात्र खोल पाण्यात कार पडल्याने पाठीमागील दरवाजा उघडता न आल्याने स्थानिक ग्रामस्थांनी काच फोडून महिलेला बाहेर काढले. मात्र उपचारा पुर्वीच महिलेचा मुत्यू झाला. समृद्धी योगेश देशपांडे (वय ३३ ,रा.शनिवार पेठ पुणे ) असे मयत महिलेचे नाव.
योगेश देशपांडे ( वय ३५) यांच्या प्रसंगाधानाने स्वतःचे व मुलगा चिराग देशपांडे ( वय १५) यांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. या प्रकरणी वेल्हे पोलिस तपास करत आहेत.
पानशेत -टेकपोळे रस्त्यावर कादवे गावच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या कस्तुरी हॉटेल पासून शंभर मीटर अंतरावर कठडे नसलेल्या पुलावरून कार थेट पानशेत धरणात कोसळली.
कार कोसळताच योगेश देशपांडे हे तत्काळ बाहेर पडले. त्यांना पोहता येत असल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोहत जाऊन पुढील सिटवर बसलेल्या चिरागला बाहेर काढले.
गाडीचा आवाज ऐकून जवळील हॉटेलचे मालक वैभव जागडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तो पर्यंत पाणी शिरल्याने कार खोल पाण्यात गेली. पाण्यामुळे पाठीमागचा कारचा दरवाजा उघडता आला नाही.
समृद्धी यांना बाहेर काढण्यासाठी योगेश देशपांडे व वैभव जागडे यांनी खोल पाण्यात धाव घेतली. पाठीमागच्या दरवाजाची काच तोडून त्यायांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. त्यानंतर तातडीने समुद्धी यांना कार मधून पानशेत येथील एका खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र उपचारा पूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता.
याबाबत कादवे ग्रामपंचायतचे सदस्य शंकर ढेबे यांनी पोलीसांना माहिती देता. पानशेत पोलीस चौकीचे पोलीस जवान अजय साळुंखे, राजाराम होले ,योगेश गरुड यांच्या पथक घटनास्थळी पोहचले . समृद्धी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला.
कारचा टायर फुटल्याने गाडी रस्त्यावरून घसरत जाऊन पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळली. त्यामुळे दुर्घटनेत घडली असे वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी सांगितले.
कादवे येथील स्मशानभूमीजवळील धरणालगत असणाऱ्या रस्त्याला संरक्षण कठडे नाहीत. या ठिकाणी उतार असून पुढे वळण आहे. त्यामुळे वाहन चालकांना अंदाज येत नाही आणि असे अपघात होतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने या घटनेला गांभीर्याने घेवून त्या ठिकाणी संरक्षण कठडे बसवणे गरजेचे आहे.
– शंकर ढेबे, ग्रा.पं.सदस्य, कादवे