नवी दिल्ली – नेपाळ आणि भारताच्या सीमेवरील मलंगवा गावाजवळ दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाल्यामुळे तेथे बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीतील वादाच्या मुद्यावरून दोन गटांमध्ये हा तणाव निर्माण झाला. गुरुवारी रात्री 10 वाजता लागू करण्यात आलेली संचारबंदी पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहणार आहे, असे सरीयाही जिल्ह्याचे मुख्य अधिकारी इंद्र देव यादव यांनी सांगितले.
मलंगवा हे सरीयाही जिल्ह्याचे मुख्यालय आहे आणि सीतामढी येथे नेपाळ भारत सीमेजवळ हे गाव आहे. संचारबंदीची हद्द पूर्वेकडील झिम नदीपासून पश्चिमेकडील मुसैली कालव्यापर्यंत आहे, यामध्ये दक्षिणेकडील नेपाळ-भारत सीमावर्ती प्रदेश आणि उत्तरेकडील बाबा पेट्रोल पंपाजवळील क्षेत्राचा समावेश आहे, असे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मुद्यावरून हा तणाव निर्माण झाला असून संचारबंदी लागू झाल्यानंतर जिल्हा मुख्यालयातील परिस्थिती स्थिर झाल्याचे येथील जिल्हा पोलीस कार्यालयाचे प्रमुख नरेश राज सुबेदी यांनी म्हटले आहे. संचारबंदीच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी नागरिकांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.