महापालिकेची हातगाड्यांवर कारवाई : विक्रेते हतबल; प्रशासनाकडून करोनाचे कारण
पिंपरी – गेल्या पाच महिन्यांपासून शहरामध्ये करोना विषाणूचा संसर्ग सुरू आहे. त्यामुळे शहरामध्ये लॉकडाऊन करण्यात आला होता. अद्यापही शहरामध्ये दुकाने, स्टॉल्स यांच्यावर बंधने आहेत. तर हातगाड्यांवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना परवानगी देण्यात आलेली नाही. गेल्या पाच महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने उपासमारीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या विक्रेत्यांनी पुन्हा एकदा आपल्या हातगाड्यांवर व्यवसायाला सुरुवात केली.
परंतु महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. पाच महिन्यांनंतर एखाद्या व्यावसायिकांने व्यवसाय सुरू केला तर महापालिका प्रशासन करावाई करत आहे. त्यामुळे आता आम्ही जगायचे कसे असा आर्त सवाल हे व्यावासायिक करत आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये आठ पथकांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमध्ये टेम्पो, हातगाड्या, व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
करोना विषाणूला रोखण्यासाठी गर्दी होऊ न देणे आवश्यक आहे. त्यासाठी अतिक्रमण विभागाच्या आठ पथकांमार्फत कारवाई करण्यात येत आहे. मात्र यामध्ये हातगाड्यांवर पोट भरणाऱ्या अनेक गरीब कुटुंबांची फरफट होत आहे. प्रशासन स्पष्टपणे विचारत आहे की, करोनाला रोखायचे की व्यवसाय करु द्यायचा? परंतु किती दिवस कामधंदा न करता घरात बसून राहायचे? आम्ही जगायचे कसे? असे प्रतिप्रश्न व्यावसायिक करत आहेत. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात दानशूर व्यक्ती आणि संस्थांकडून वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली जात होती. त्यावर अनेकांनी आपले कुटुंब चालविले परंतु आता मदतीचा ओघही आटला आहे. यामुळे जगण्यासाठी काहीच पर्याय या गरीब हातगाडीधारकांकडे शिल्लक राहिलेला नाही.
शहरात करोना दिवसेंदिवस वाढत आहे. व्यावसायिकांची होणारी अडचण योग्य आहे. मात्र करोना वाढला तर काय करणार. त्यामुळे नेमके महत्त्व कशाला द्यायचे करोनाला द्यायचे की हातगाड्यांवाल्यांना हा महत्तवाचा प्रश्न आहे.
– राजेंद्र राणे, कार्यकारी अभियंता, अतिक्रमण विभाग
आम्ही ज्या भागामध्ये हातगाड्या लावतो तिथे रहादारीसाठी कोणतीही अडचण येत नाही. गेल्या पाच महिन्यांपासून व्यवसाय ठप्प आहेत. खाद्यपदार्थ विक्रेत्यांना व्यवसाय सुरू करू देत नाही. त्यांनी जगायचे कसे हा प्रश्न आहे. गेल्या पाच महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने घरातील, बॅंकेतील पैसे संपले आहेत. घरात खायला काही नाही अशी परिस्थिती आहे. किती दिवस असे लॉकडाऊन सुरू राहणार. आमचा पण पालिका प्रशासनाने विचार करणे आवश्यक आहे. प्रशासन येऊन थेट कारवाई करते. त्यामध्ये आमच्या हातगाड्या, वस्तू जप्त केल्या जातात.
– व्यावसायिक, बिजलीनगर