डब्लिन :- दुखापतीमुळे कित्येक काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागले असले तरीही पुनरागमनाचा ठाम विश्वास होता, असे मत भारताचा बदली कर्णधार व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने व्यक्त केले आहे. भारतीय संघ बुमराहच्याच नेतृत्वाखालील आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळत आहे.
बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या मालिकेत तीन टी-20 सामने खेळणार आहे. बुमराह दीड वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन करत आहे. बुमराहने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याने चार षटकांत 50 धावा दिल्या होत्या. ही त्याची टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात महागडी गोलंदाजी ठऱली होती. बुमराह वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करत असून, त्याने यापूर्वी गेल्या वर्षी बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते.
माझी दुखापत पूर्ण बरी होण्यास वेळ लागणार आहे हे जेव्हा समजले तेव्हा निराश झालो होतो. हा काळ हा खूप निराशाजनक होता. मात्र, मी लवकरात लवकर तंदुरुस्त कसे व्हावे आणि पुनरागमन कसे करावे याचाच जास्त विचार करत होतो. विश्वकरंडक स्पर्धेच्या प्रत्येक सामन्यात पूर्ण 10 षटके टाकण्यासाठी आता मी पूर्ण तंदुरुस्त बनलो आहे व हेच मला आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतही सिद्ध करायचे आहे.
दुखापतीच्या कालखंडाला मी कधीही बॅडपॅच समजले नाही. उलट मी या काळात खूप काही शिकलो. माझी कारकीर्द संपल्याचे मला कधीही वाटले नाही. उलट मला पुनरागमन करायचेच आहे हेच ध्येय ठेवले होते, असेही बुमराह म्हणाला.
आपण जेव्हा दुखापतीचा सामना करत असतो, तेव्हा तुम्ही ती लवकरात लवकर बरी व्हावी याचा प्रयत्न करता. बाकीचे काय म्हणतात याकडे फारसे लक्ष दिले नाही. मला त्यातून लवकरात लवकर सावरायचे होते. माझ्या आयुष्यातील हा सर्वात वाईट काळ होता, असे म्हणूनच मी त्याकडे पाहिले. तो काळ कुठल्या ना कुठल्या रुपात तुमच्यासमोर येतोच, मात्र त्याला तुम्ही कसे तोंड देता हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. मात्र, याच काळात मला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली, हे मला जास्त समाधानकारक वाटले. क्रिकेटपासून दूर राहिलो त्यावेळी माझ्या कुटुंबाने खूप पाठिंबा दिला व सहकार्य केले. सहकाऱ्यांशी संवाद साधल्याने मला प्रेरणा मिळाली, असेही तो म्हणाला.
दुखापत बरी होण्यासाठी वेळ लागत आहे हे लक्षात आल्यावर मी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील (एनसीए) अनेक खेळाडूंना भेटलो. काही वेळा आयुष्यात घटणाऱ्या घटना तुमच्या नियंत्रणात नसतात. शरीराला सावरण्यासाठी वेळ लागतो आणि शरीराचा आदर करणे आवश्यक असते.
जेव्हा तुम्ही सातत्याने क्रिकेट खेळत असता तेव्हा ऑफ-सीझन कसा असतो हे माहित नसते. या टप्प्यावर माझ्या शारीरिक समस्या संपेपर्यंत मला माझ्या फिटनेस आणि गोलंदाजीवर काम करायचे होते. संघाची कामगिरी कशी आहे हे मी पाहत होतो आणि खेळाडूंना भेटणे, त्यांच्याशी बोलत राहणे यातून लवकर बरा झालो, असेही त्याने म्हटले आहे.