राजगुरूनगर – कमान (ता. खेड) गावाच्या हद्दीत असलेल्या कोळोबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जंगलातील पक्षी व अन्य वन्य प्राण्यांसाठी एका शिक्षक दाम्पत्याने स्वखर्चाने पाण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन प्राण्यांची तहान भागवली आहे. सर्वत्र उन्हाची दाहकता असताना जंगलातील नैसर्गिक जलस्त्रोत आटले आहेत. त्यामुळे जंगलातील पशुपक्ष्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही.
पाण्यावाचून या पशुपक्ष्यांचे हाल होत असल्याचे पाहून पर्यावरणप्रेमी संजय नाईकरे व त्यांच्या पत्नी वैशाली नाईकरे यांनी दोन वर्षांपासून स्वखर्चाने वन्य जीवांच्या पाण्याची व अन्नाची सोय करायचा उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी काळोबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जुन्या पाणवठ्यावर स्वखर्चातून तळे खोदले आहे. या पाणवठ्याच्या परिसरात वानरे, मोर, बिबट्या, लांडगे, कोल्हे, तरस, ससे, खारूताई, रानमांजर, उदमांजर, मुंगुस या प्राण्याचे अस्तित्व असल्याने त्यांना पाण्याची सोय या शिक्षकांनी करून दिली आहे .
या वन तळ्यात तीन टॅंकर पाणी टाकले आहे. या वनतळ्याची कान्हेवाडी येथील राहुल सहाणे, युवा कार्यकर्ते अंकुश निमसे, काळेची वाडीचे राजाराम सातकर, मिरजेवाडीचे नवनाथ चव्हाण, विश्वराज नाईकरे व वनविभाग खेडच्या अधिकारी एस. जे. नायकवाडी, कोयनानगर पुणे येथील पर्यावरण तज्ज्ञ पियादाद फर्नांडिस यांनी या वनतळ्याला सपत्निक भेट देऊन पाहणी केली. या तळ्यात एकाचवेळी सुमारे साडेचार ते पाच हजार लीटर पाणी मावते. येथे वन्य प्राणी व पक्ष्यांची संख्या लक्षणीय आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे नाईकरे यांनी तयार केलेल्या वनतळ्यात पाणी पिण्यासाठी पक्षुपक्षी येत आहेत.