नवी दिल्ली – रुपया घसरत असल्यामुळे आणि जागतिक आणि देशांतर्गत बाजारात कच्च्या मालाचे दर वाढत असल्यामुळे वाहन कंपन्या दरवाढ करीत आहेत. त्यामध्ये टाटा मोटर्स सामील झाली आहे.
पुढील आठवड्यापासून टाटा मोटर्सने आपल्या काही प्रवासी वाहनाच्या किमतीत वाढ करणार असल्याचे सांगितले आहे. कार तयार करण्यासाठी लागणाऱ्या काही धातूंच्या दरात गेल्या एक वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याचबरोबर सेमीकंडक्टरचा तुटवडा जाणवत आहे.
त्यामुळे काही वाहनांच्या किमतीत साडेआठ टक्क्यापर्यंत वाढ करावी लागत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनी आपल्या उत्पादन खर्चात कपात करून ग्राहकांना कमीत कमी दरवाढ सोसावी लागेल यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत आम्हाला काही प्रमाणात दरवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला मारुती सुझुकी या कंपनरने आपल्या उत्पादनांच्या दरात वाढ केली होती. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यापासून होंडा कंपनी आपल्या वाहनांच्या दरात वाढ करणार आहे.