पुणे -समाज आणि देशसेवेसाठी आज प्रत्येकाने थोडा तरी वेळ दिला पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात काम करताना पगारापोटी, तक्रार न करता काम करीत राहिलात तरच कामात आनंद मिळतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील सी.पी.डी. व आय.टी. विभाग यांच्या वतीने “शैक्षणिक नेतृत्वाचा ऑनलाइन व्यावसायिक विकास’ या कार्यक्रमात “मागे वळून पाहताना’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यात डॉ. मंदाकिनी आमटे, विद्या प्राधिकरणाचे संचालक दिनकर टेमकर, नागपूरचे प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूरचे उपसंचालक रवींद्र रमतकर, सीपीडी विभागाचे अधिव्याख्याता अरुण जाधव, सहायक संचालक तथा सीपीडी विभागाचे उपविभाग प्रमुख महेश चोथे, विषय सहायक महेंद्र बागडे, आयटी विभागाचे प्रभारी प्राचार्य विकास गरड, विषय सहायक अभिनव भोसले आदींनी सहभाग घेतला होता.
आदिवासींच्या परंपरा व संस्कृती यांचा अभ्यास केला. सुरुवातीस आदिवासी लोकांचा आमच्यावर विश्वास नव्हता. ते खूप अंधश्रद्धाळू होते. आजारी लोकांच्या उपचारासाठी ते मांत्रिकांचा आधार घेत असत. त्यांच्या विकासासाठी आव्हाने खूप होती, पण इच्छाशक्ती असल्याने त्यातूनच यश मिळत गेले. आदिवासींच्या पाल्याच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी यासाठी मार्गदर्शन केले, असे डॉ. प्रकाश आमटे यांनी स्पष्ट केले.
आमच्या मुलांनी वैद्यकीय शिक्षण घेऊन सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल उभे केले. या ठिकाणी इंटरनेट व तंत्रज्ञानाचा वापर केला. रस्ता, वीज, दूरध्वनी सेवा नसलेल्या ठिकाणी शाळा उभी केली. आज इतर गावचे पालक त्यांच्या गावात शाळा सुरू करण्याबाबत आग्रही आहेत. दुर्मिळ भागात पाण्याची समस्या नेहमीच भेडसावत असते. पाण्यासाठी लोकसहकारातून तलाव निर्माण केला. लोकांचे शेतीतील उत्पन्न वाढले. गावचा विकास होण्यास हातभार लागला असल्याचेही त्यांनी सांगितले.
गावामध्ये संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न केले. स्त्रियांवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होत नाही. एखाद्या व्यक्तीला समस्या आल्यास इतर लोकांची मदत घेऊन त्या व्यक्तीस सहकार्य केले जाते. गावामध्ये चोरी नावाचा प्रकार नाही. गावातील लोकांवर संस्कार रुजवण्यासाठी प्रयत्न केले, असे डॉ. मंदाकिनी आमटे यांनी सांगितले.