चंडीगढ – करोनालसीचा डोस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांबाबत पंजाब सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. लसीचा एक तरी डोस घ्या; अन्यथा सक्तीच्या रजेवर पाठवले जाईल, असा इशारा त्या सरकारने दिला आहे.
पंजाबमधील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी लसीचा डोस घ्यावा यासाठी कॉंग्रेस सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. करोना संसर्गापासून जनतेला संरक्षण पुरवण्याची आणि डोस घेण्याची टाळाटाळ करणाऱ्यामुंळे इतरांना नाहक किंमत चुकवावी लागू नये याची निश्चिती सरकारकडून केली जात आहे.
त्याचाच भाग म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे. लसीचा किमान पहिला डोस घेण्यासाठी त्यांना 15 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे.
त्यामुळे करोनाविरोधी लढ्यात कमी पडू नये याची दक्षता सत्ताधारी कॉंग्रेसकडून घेतली जात आहे. त्यातून त्या पक्षाचे सरकार प्रसंगी कठोर भूमिकाही घेईल याचे संकेत सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या इशाऱ्यातून मिळत आहेत.