वयाचं बंधन जर कोणत्या नात्याला नसेल तर ते आहे मैत्रीचं नातं. मैत्री म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं एक जाळीदार पान. अशीच घट्ट मैत्री होती सदा, मुकुंदा, सखा आणि वसंताची. सगळ्यांनीच वयाची हाफ सेंचुरी पूर्ण केली होती. काहींच्या “बत्तिशीची’ कधीच विकेट पडली होती, तर काहींच्या डोक्यावर शिल्लक राहिलेले केस जणू त्या मधोमध पडलेल्या टकलाच्या बाजूने उभं केलेलं कुंपणच! सगळ्यांच्याच डोळ्याला ढापण लागलं होतं. पण सकाळी फिरायला गेल्यानंतर जॉगिंग करणाऱ्या एखाद्या सुंदर मुलीकडे पाहिलं की, आपसूक यांच्या डोळ्यात कुठून दिव्य तेज यायचं कुणास ठाऊक! “आपल्या कॉलेजातली ती मालती अशीच दिसायची, हो ना सदा?’ “नाही रे, तिची मैत्रीण तशी दिसायची, कुसूम.’ सदा आणि मुकुंदामध्ये कधी यावर एकमत व्हायचंच नाही. नेहमीप्रमाणेच त्यादिवशी वसंताने मध्यस्ती केली. “ते राहू द्या. आधी हे सांगा चहा कोण सांगतय आज?’ “मीच सांगतो. आज माझीच पाळी आहे.’ “हो का! मग मुकुंदा तू म्हणतो तेच बरोबर आहे. ती मुलगी मालती सारखीच दिसते.’ असं म्हणताच एकच हशा पिकला आणि चौघांची पावलं त्यांच्या नेहमीच्या हॉटेलकडं वळली.
चौघांना हॉटेलमध्ये शिरताना पाहून, “रामू, टेबल नंबर 4 साफ करून घे. तुला कितीवेळा सांगितलं या वेळेला तो टेबल रिकामा ठेवत जा.’ “नको रे ओरडत जाऊ त्याच्यावर. काय फरक पडतो तिथं कोणी बसलं तर.’ “नाही बाबा. तो तुमचा हक्काचा टेबल आहे. या बसा.’ असं म्हणून मालकाने ऑर्डर दिली. 1 बिनसाखरेचा, 1 कमी साखरेचा आणि 2 ग्रीन टी. थोड्याच वेळेत चहा टेबलवर हजर. सखाने चहाचा घोट घेत, “वसंता, दिवाळी आली दहा दिवसांवर. यंदा तरी कौस्तुभ आणि त्याची बायको येणार आहेत की नाही?’ वसंताने चहावर फुंकर घालत वर पहिले. “नाही माहीत. बहुतेक आम्हालाच जावं लागेल हे घर सोडून कायमचं.’ हे ऐकून तिघे एकमेकांकडे गंभीर होऊन पाहू लागले.
मुकुंदा बोलू लागला. “घर सोडून म्हणजे कुठं वसंता?’ “अं… कुठं म्हणजे हेच…अमेरिकेला, आमच्या कौस्तुभकडे.’ “हो पण, असं अचानक?’ “हं. कालच त्याचा फोन आला होता. म्हणत होता तिकडे खूप मोठं घर घेतलय आम्हा दोघांसाठी. त्यामुळं हे घर विकायचं ठरवलंय.’ वसंताच्या आनंदात आनंद मानावा की तो एवढ्या दूर सोडून चालल्याचं दुःख करावं हे कुणालाच समजत नव्हतं. “हा असा कसा जाऊ शकतो आपल्याला सोडून आणि तेही असं अचानक?’ “मुकुंदा, शांत हो. बोलू आपण त्याच्याशी.’ असं म्हणून सदाने मुकुंदाची समजूत काढली.
दिवस जसजसे पुढे सरकत होते तशी वसंताची अस्वस्थता सगळ्यांनाच जाणवत होती. त्यादिवशी हॉटेलमध्ये, “सदा, हे घड्याळ तुझ्यासाठी. मुकुंदा, हा पेन खास तुझ्यासाठी. महागडा आहे जपून ठेव. लिहीत जा सतत. वाचायला आवडतं तू लिहिलेलं. आणि सख्या हे तुझ्यासाठी स्वेटर.’ “वसंता काय गरज होती या सगळ्यांची. केलंस ना परकं.’ “नाही रे मुकुंदा. माझी आठवण म्हणून देतोय.’ “आपण पुन्हा कधी भेटणारच नाही का?’ “कधी गेलास का महाबळेश्वरच्या पुढे? आणि तू कधी येणार मला तिकडे भेटायला?’ “आम्ही नाही पण तू तर येशील?’ “अं… हो…हो…’ वसंताने हॉटेल मालकाला बोलावलं. “अँड यु यंगमॅन, हा लॉफिंग बुद्ध तुझ्यासाठी.’ “बाबा, हे कशाला?’ “वसंता आपल्याला सोडून त्याच्या मुलाकडे अमेरिकेला चाललाय.’ “कधी आला इकडे तर भेटायला विसरू नका. ये रामू, टेबल नंबर 4 वर नेहमीचे चहा दे. आज चहा माझ्याकडून.’
दुसऱ्या दिवशी मुकुंदा सहजच वसंताच्या घरी गेला. घराला कुलूप होतं. मुकुंदाने फोन लावला पण वसंताचा मोबाइल बंद होता. तिघेही दिवसभर फोन करत राहिले पण काहीच उपयोग झाला नाही. कौस्तुभचाही नंबर कोणाकडे नव्हता. डोळ्याची पापणी लवते तशी सर्रकन वर्षं निघून गेली. गेल्या कित्येक वर्षात ना वसंताचा कधी फोन आला ना त्याची काही खबर मिळाली. त्यादिवशी मुकुंदाच्या नातीचा वाढदिवस होता. “बाबा, मी काय म्हणतो केक वगैरे नको. त्यापेक्षा आपण एखाद्या वृद्धाश्रमाला भेट देऊ या का?’ दरम्यानच्या काळात मुकुंदा एकटा पडला होता. मैत्रीच्या पुस्तकातील सदा आणि सखा नावाचं पान कधीच गळून पडलं होतं, तर वसंता नावाचं पान वाऱ्याबरोबर उडून कुठं तरी हरवलं होतं. कदाचित यानिमित्ताने का होईना मुकुंदाचा विरंगुळा होईल असं त्याच्या मुलाला वाटत होतं. ठरल्याप्रमाणे ते आश्रमात गेले. तन्वीच्या हाताने मिठाई आणि कपडे देत असताना अचानक कानावर आवाज पडला. “खुश राहा बाळा. एक पापा घेऊ तुझा?’ असं म्हणत त्या वयस्कर आजीने तन्वीला जवळ घेतले. मुकुंदा दुरून पाहत होता. त्याच्या नजरेत कुणाचीतरी पुसटशी ओळख दिसत होती.
मुकुंदाने जवळ जाऊन पाहिलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने थरथरत्या आवाजात विचारलं, “वहिनी, तुम्ही?’ समोरची वृद्ध स्त्री दुसरीतिसरी कोणी नसून वसंताची बायको होती. “हो, मीच.’ असं म्हणून मुकुंदाकडं पाहताना तिला अश्रू अनावर झाले. “तुम्ही इथे कशा आणि वसंता कुठंय?’ “नशिबाचे खेळ सगळे. पोटच्या पोराने कधीच लाथाडलं होतं. जगाला हसू नको म्हणून लपवून ठेवलं. हा धक्का त्यांना सहन नाही झाला. तुमचे मित्र आता या जगात नाही.’ समोर जे काही दिसत होतं त्यावर विश्वास ठेवण्यापलीकडं मुकुंदाच्या हातात काहीच उरलं नव्हतं. मुकुंदा ढसाढसा रडू लागला. आजही मुकुंदा त्या हॉटेलात जातो आणि त्याच टेबलवर वसंताने दिलेलं पेन घेऊन लिहीत बसतो. त्याच्या डायरीतील पान मैत्रीच्या आठवणी लिहिताना संपूच नये असं वाटतं. पण एक ना एक दिवस ती डायरी भरणार आणि हा “टेबल नं. 4′ रिकामा होणार, हेच खरं!
अमोल भालेराव