शॉर्टफिल्मचा उपयोग किती उत्तम प्रकारे करता येतो, हे सुमित्रा भावे यांनी बरोबर ओळखले होते. “साखरेपेक्षा गोड’ नावाचा त्यांनी दिग्दर्शित केलेला लघुपट एक महत्त्वाची गोष्ट जनसामान्यांपर्यंत पोहोचवतो.
गरोदरपण, बाळंतपण याबद्दल अद्यापही अनेक गैरसमज आहेत आणि त्याचे दुष्परिणाम बाळ-बाळंतिणींना जन्मभर भोगावे लागतात. या फिल्ममधून आरोग्यविषयक काही महत्त्वाच्या सूचना, माहिती अशा पद्धतीने चित्रित केली आहे की, आपण ही साखरेपेक्षा गोड कथा, त्यातील कलाकारांचा अभिनय यातच रंगून जातो आणि त्यातले ज्ञान, आशय मनामध्ये आपोआप नोंदवला जातो.
लेक (देविका दफ्तरदार) बाळंतपणासाठी माहेरी येणार म्हणून तिची आजी, आई, वहिनी सगळ्या जय्यत तयारीला लागल्या आहेत. जावई केईएम हॉस्पिटलमधे ऑफिसबॉय म्हणून काम करतो. ओम भुतकर या गुणी कलाकाराने शिवा नावाच्या या साध्या पण हुशार पतीची भूमिका फार सुरेख केली आहे. बायकोला म्हणजे लक्ष्मीला आता दिवस भरल्यामुळे काम होत नाही म्हणून शिवा नऊ वाजता पाणी आल्यावर घरचं पाणी भरतो आणि धावतपळत हॉस्पिटल गाठतो.
डॉक्टर भालेराव यांची भूमिका रेणुका दफ्तरदार हिने केली आहे. त्यांनी व त्यांच्या सीनिअर डॉक्टर पार्वतीमॅडम ह्यांनी बरीच वर्षे अभ्यास करून अनेक गरोदर स्त्रियांबाबत काही निरीक्षणे नोंदवून त्यांचा अभ्यास केला आहे. या संबंधातला डॉ. भालेराव यांचा लेख ब्रिटिश मेडिकल जर्नलमधे छापून आला आहे. तो वाचून डायबेटिसमधले तज्ज्ञ डॉक्टर देसाई फोन करून डॉ. भालेराव यांचे अभिनंदन करतात आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी ते त्यांना आमंत्रण देतात.
शिवा बायकोला घेऊन तिच्या माहेरगावी तिला पोहोचवण्यासाठी निघाला आहे. लक्ष्मी त्याला म्हणते, “मला भीती वाटतेय. नीट होईल नं सगळं…?’ बऱ्याच पुरुषांप्रमाणे हाही उत्तर देतो, “त्यात काय भ्यायचं? माझ्या आईला धा पोरं झाली. आज्जीला बारा.’ त्यावर ती इतकंच म्हणते, “…आणि जगली किती? धडधाकट किती?’ गावी त्यांचे उत्तम स्वागत होते. काही काळजी करू नका, आम्ही तिचं सगळं नीट करू; असं तिघी बायका जावयाला तोंड भरून सांगतात. हा परत येतो.
डॉ. भालेराव यांनी त्यांच्या लेखात असे सांगितलेले असते की, बाळ आईच्या पोटात असताना ज्या मातांना पोटभर व सकस अन्न खायला दिले जात नाही; त्यांना मोठेपणी डायबेटिस होण्याची शक्यता जास्त असते. सर्व आकडेवारी व निरीक्षणांवरून त्यांनी त्यांचा हा निष्कर्ष त्यात मांडलेला आहे. हे सारे शिवा ऑफिसबॉय म्हणून तिथे थांबलेला असताना लक्षपूर्वक ऐकत असतो.
इकडे माहेरी लक्ष्मीला इकडची काडी तिकडे करू दिली जात नाही. पण जेवायला मात्र पोटभर दिले जात नाही. आज्जी म्हणते, “पोट फार मोठं वाटतंय. दुधातुपाला हात आखडता घ्यायला हवा. पोटातच बाळ वाढलं तर बाळंतपण अवघड जाईल.’ लक्ष्मी एकदा फोन करते नवऱ्याला. म्हणते, “भूक लागते. चांगलंचुंगलं खावंसं वाटतं पण बाळाचं वजन वाढेल म्हणून कमी देतात जेवायला.’ शिवाच्या आत्याला चाळीशीपासून डायबेटिस आहे.
डॉ. भालेराव तिला मुद्दाम तपासायला बोलावतात. तपासतात. म्हणतात, “आधीपासूनच तुम्ही अशा बारकुड्या होतात का?’ ती म्हणते, “आमच्या आईला नेहमी कमी वजनाचीच बाळं झाली. त्यामुळे तिला बाळंतपण सोपं गेलं.’ मग डॉ. भालेराव तिला समजावून सांगतात की, जन्मतः वजन कमी असेल तर पुढे अनेक रोगांना आमंत्रण मिळू शकतं आणि म्हणूनच तुम्हालाही इतक्या लवकर डायबेटिस झाला आहे.
डॉक्टर गरोदर स्त्रियांबद्दल काय बोलतायत, इकडेहही शिवाचं नीट लक्ष असतं. तो मग डॉक्टरांना सांगतो की, “लक्ष्मीचं तिकडं ठीक चाललंय. काम करू देत नाहीत. पण बाळाचं वजन वाढलं तर बाळंतपण जड जाईल म्हणून जेवण मात्र कमी देतात.’ डॉक्टर चक्रावतात. त्या म्हणतात, “असं का? उलट खेड्यातली शुद्ध हवा… तिला भूक जास्त लागत असणार. शिवाय तिथं ताजा भाजीपाला, उत्तम फळं, दूधदुभतं… दोन जिवांची बाई ती. तिला उपाशी का ठेवता? काम करू दे तिला म्हणजे व्यायाम झाल्यानं स्नायू बळकट होतील. भरपूर जेवू दे म्हणजे कळा द्यायला ताकद येईल.’
शिवा सरळ सासुरवाडीला फोन करतो आणि बायकोला म्हणतो, “मी स्वतःच तुझ्या आज्जीशी बोलतो.’ मग तो त्यांना डॉक्टर काय म्हणतात, ते नीट पटवून सांगतो. आज्जीला कळते. आणि मग लक्ष्मी कामही करते आणि जेवतेही भरपूर. तिला सुरेख, गुटगुटीत मुलगी होते. दोघींचीही तब्येत उत्तम. ही फिल्म बोधप्रद असूनही कुठेही प्रचारकी किंवा कंटाळवाणी वाटत नाही.
माधुरी तळवलकर