कोल्हापूर (प्रतिनिधी) – पश्चिम महाराष्ट्रात ऊस आंदोलनाने पेट घेतला आहे. दोन टप्प्यातील एफआरपी ऐवजी एक रकमी एफआरपी चा कायदा हिवाळी अधिवेशनात संमत करावा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आर-पारची लढाई सुरू केली. साताऱ्यात ऊसाचा ट्रॅक्टर पेटवला. तसेच सांगलीत ऊस वाहतुक करणा-या वाहनांची हवा सोडली, तर कोल्हापुरात वाहने रोखल्याने ऊस आंदोलन चांगलंच धगधगताना दिसत आहे.
सातारा, सांगली व कोल्हापूर अर्थात पश्चिम महाराष्ट्र हा सगळा सहकार चळवळीतील जिल्हे. यंदाचा ऊस गळीत हंगामही सुरू झाला आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना या ऊस गळीत हंगामात एफआरपीच्या मुद्यावरून चांगलीच संतप्त झाली आहे. दोन टप्प्यातील एफआरपी ऐवजी एक रकमी एफआरपीचा कायदा हिवाळी अधिवेशनात संमत व्हावा. यासह इतर विविध मागण्यांसाठी अद्याप राज्य सरकारच्या पुढाकारातून न झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यातील ऊस तोडी आणि ऊस वाहतूक बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.
मात्र स्वाभिमानीच्या या आंदोलनाला साखर पट्ट्यातच कारखानदार आणि त्यांच्या समर्थकांनी आव्हान देत ऊस वाहतूक सुरूच ठेवली. परिणामी आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्याच्या इंदोली गावत ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पेटवला. सांगलीत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या टायरी फोडत हवा सोडली.. तर कोल्हापुरात ऊस तोडणी आणि ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्याही अडवल्या.
दरम्यान स्वाभिमानीच्या या आंदोलनाला साखर कारखानदारांच्या कार्यकर्त्यांनी जरी आव्हान दिला असलं तरी शेतकऱ्यानी आंदोलनात उडी घेत उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील भोगावती येथे पहाटेपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली बैलगाड्या आणि ट्रक मोठ्या प्रमाणावर अडवले आहेत. या आंदोलनामध्ये शेतकरी देखील रस्त्यावरती उतरून राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधातील निषेध या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहे.