नवी दिल्ली – पंजाबमध्ये सतलज-यमुना जोड प्रकल्पाच्या (Satlej Yamuna connection project) मुद्यावरून शिरोमणी अकाली दल राज्य सरकारविरोधात आक्रमक झाला असून आज मुख्यमंत्री भगवंत सिंग मान (CM Maan) यांच्या सरकारी निवासस्थानावर काढलेल्या मोर्च्याला अडवण्यासाठी पोलिसांना आंदोलकांवर पाण्याचे फवारे मारावे लागले. सतलज आणि यमुना या नद्यांच्या पाण्यावर पंजाबच्या हक्काचे रक्षण करण्यात राज्य सरकारला अपयश आले असल्याची टीका शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल (Sukhabir singh badal) यांनी केला आहे. पक्षाच्या मुख्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनात माजी खासदार प्रेमसिंग चंदूमाजरा, माजी मंत्री बिक्रम सिंग मजिठिया, दलजित सिंग चीमा आणि अकाली दलाचे ज्येष्ठ नेते बलविंदर सिंग भूंदर यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.
अकाली दलाच्या निषेध मोर्च्याला अडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी अडथळे उभे केले होते. हे अडथळे हटवून आंदोलकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी पाण्याचे फवारे मारून आंदोलकांना पिटाळून लावले. त्यानंतर पोलिसांनी बादल, मजिठिया आणि चीमा यांच्यासह पक्षाच्या नेत्यांना ताब्यात घेतले.
सतलज-यमुना जोड प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्व विरोधी नेत्यांना चर्चेचे आव्हान दिले होते. मात्र पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाण्यापासून रोखल्याचा आरोप बादल यांनी केला. पंजाबमध्ये 1955 ते 1946 दरम्यान सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसच्या सरकारांनी सतलज आणि यमुना नद्यांचे पाणी राजस्थान आणि हरियाणाला सोडून पंजाबवर अन्याय केला. तर नदीजोड प्रकल्पाला विरोधकांचा विरोध असल्याचा खोटा दावा मान यांनी सर्वोच्च न्यायालयात केल्याचा आरोपही बादल यांनी केला.