नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील स्थगिती 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. भारताबरोबरच जगभरातील करोना संकट कायम असल्याने ते पाऊल उचलण्यात आले. त्याविषयीचा निर्णय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सोमवारी जाहीर केला.
डीजीसीएने काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांना याआधीच विशेष मंजुरी दिली आहे. ती विशेष उड्डाणे आणि मालवाहतुकीसाठी होणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे यापुढेही होत राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
करोना संकटामुळे भारताने 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सेवा देणाऱ्या विमानांची ये-जा बंद आहे.
मात्र, भारतीयांना परत आणण्यासाठी आणि परदेशी नागरिकांना त्यांच्या देशांमध्ये पाठवण्यासाठी मधल्या काळात विशेष उड्डाणांना परवानगी देण्यात आली. त्याशिवाय, मोजक्या देशांशी झालेल्या करारांनुसार काही उड्डाणे सुरू आहेत.