Sushma Andhare – शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याच्या वृत्ताने एकाच खळबळ उडाली आहे. सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाचे बीड जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडीओ जारी केल्यानंतर हे प्रकरण राज्यभरात पोहोचलं आहे. अशातच आता सुषमा अंधारे यांनी समोर येत याबाबत आपली भूमिका मांडली आहे तसेच मारहाणीच्या दाव्यावर देखील भाष्य केलं आहे.
“…म्हणून बरेच लोक अस्वस्थ”
सुषमा अंधारे यांनी याबाबत बोलताना महाप्रबोधन यात्रेला प्रथमच पक्षाचे खासदार संजय राऊत व त्या एकत्र मंचावर असणार असल्याचं सांगताना, “महाप्रबोधन यात्रा २० मे रोजी होणार आहे. ही सभा ग्रामीण भागातील समारोपीय सभा आहे. आतापर्यंत जेवढ्या महाप्रबोधन सभा झाल्या त्या सर्व वादळी झाल्या. महाप्रबोधन यात्रा म्हटलं की चर्चा, वाद हे आलेच. विशेष म्हणजे या समारोप सभेला संजय राऊत असणार आहेत. म्हणजे पहिल्यांदाच महाप्रबोधन सभेला मी आणि संजय राऊत एकत्र असणार आहोत. त्यामुळे बऱ्याच लोकांना अस्वस्थ वाटणं स्वाभाविक आहे. बीडमध्ये बरेच वर्षे शिवसेनेची पडझड होत आहे. आता नव्याने शिवसेना उसळी मारत आहे.” असा दावा केला.
“अप्पासाहेब जाधवांच्या दाव्यामागे…”
अप्पासाहेब जाधव याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत सुषमा अंधारे यांना दोन चापट्या मारल्याचे सांगितले. यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी, “सुषमा अंधारेंवर हात उचलला असं म्हटल्यावर गोंधळ होऊ शकतो, म्हणून आप्पासाहेब जाधवांनी तसा दावा केला असावा. एखादा माणूस समोर येऊन स्वतःच सांगतो की मी हाच उचलला. याचा अर्थ निश्चितपणे त्याच्या मनात असं काही करण्याचा विचार असू शकतो,” असं मत व्यक्त केलं.
यावेळी सुषमा नाधरे यांनी, तुम्हाला मारहाण झाली का? या प्रश्नावर आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिल, “नाही. मला मारहाण झाली असती तर आप्पासाहेब जाधव परत गेले असते का. हे प्रकरण आतापर्यंत थांबलं असतं का. हा दावा करून त्यांना गोंधळ तयार करायचा आहे. यातून आमचं सभेवरील लक्ष विचलित व्हावं असं त्यांना वाटतं. काल तो माणूस ज्या आवेशात येऊन बोलला त्यावरून निश्चितपणे शिंदे गटाकडून किंवा शिवसेना पुन्हा उभी राहू नये असं वाटतं त्यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे.”