मुंबई – सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदम्यान आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख झाल्याचा दावा भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केला आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं असून नैतिकतेच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणीही निलेश राणे यांनी यावेळी केली आहे.
“मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं नाव मर्डर मिस्ट्रीममध्ये आलं आहे. सुप्रीम कोर्टात संशयितांमध्ये त्यांचं नाव रेकॉर्डवर आलं आहे. हे तितकंच गंभीर आहे. नैतिकतेच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आदित्य ठाकरेंनी तर दिलाच पाहिजे. मुलगा असल्याने त्याला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री तपासात गडबड करु शकतात,” असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
निलेश राणेंनी ट्विटरवरुनही साधला होता निशाणा याबाबत ट्विट करताना निलेश राणे यांनी यापूर्वी “उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डमध्ये आले, की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण या केसमध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे,” असं म्हंटलं होत.
ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कुणीही राहू नये
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आपलं नाव जोडलं जात असल्याने आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअऱ केली होती. यामध्ये त्यांनी, “मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून हे सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कधीही होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. या प्रश्नी मी संयमाने वागतोच आहे. अशा प्रकारे चिखलफेक करुन सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कुणीही राहू नये.” असं म्हटलं होत