सातारा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवभारत घडवण्याचे स्वप्न पाहिले आहे. सातारा-जावळी मतदारसंघातून शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपच्या माध्यमातून पुन्हा आमदार होतील आणि नवमहाराष्ट्र घडेल. राजेंना युवकांच्या समस्यांची जाण असून त्यांच्यासाठी राजे आयटी इंडस्ट्रीज जिल्ह्यात आणतील. राजेंमुळे मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळणार असल्याने त्यांना साथ द्या, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
सातारा येथील यशोदा शिक्षण संस्था प्रसारक मंडळाच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी डॉ. सावंत यांनी संवाद साधला. शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, प्रदेश सचिव सुदर्शन पारस्कर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नीलेश नलावडे, भूषण जगताप, भाजप जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जांभळे, शहराध्यक्ष धीरज घाडगे, जनार्दन जगदाळे, विजय काटवटे व शेकडो युवक-युवती उपस्थित होत्या.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, या देशात फक्त तिरंगा हाच राष्ट्रध्वज असला पाहिजे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 370 कलम हटवून ऐतिहासिक घटना घडविली आहे. भाजपच्या माध्यमातून राज्यात अनेक योजना सर्वसामान्यांसाठी राबवून त्यांचा लाभही देण्यात आला आहे. साताऱ्यातील एमआयडीसीत सरकारच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून रोजगारच्या संधी वाढविणार आहे. येथे मोठे प्रोजेक्ट आणणार आहे. मुलांनी शिक्षणातून आपले करिअर घडवून देशसेवेत हातभार लावावा. दीपिका झाड यांनी सूत्रसंचालन केले. अक्षय भोसले यांनी आभार मानले.