तळेगाव दाभाडे, {मनोहर दाभाडे} – थंडीचा हंगाम संपला असून उष्णतेने दार ठोठावले आहे. मावळ तालुक्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. त्यामुळे हवेचा कुलर, होम एअर कंडिशनर (एसी) उत्पादकांना या वर्षी त्यांच्या विक्रीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. एसी उत्पादकांनीही मागणीची पूर्तता करण्यासाठी त्यांचे उत्पादन वाढविल्याची माहिती आहे. मध्यमवर्गीयांकडून मागील वर्षापासून एसीची मागणी वाढल्याचे चित्र सर्वत्र आहे.
यावर्षी कुलर, एसीच्या विक्रीत सुमारे २० टक्के वाढ अपेक्षित आहे. देशभरात तापमान वाढत असल्याने उन्हाळा सुरू झाला आहे. मासिक उत्पन्नात वाढ झाल्याने सध्या मध्यमवर्गीयांकडून कुलर, एसीला मागणी वाढू लागल्याचे चित्र आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास कुलर, एसीच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. कार्यालय, वाहनांमध्ये एसीत राहण्याची सवय लागल्यानेच मध्यमवर्ग एसीकडे वळत असल्याचे निदर्शनास येत आहे.
उन्हाळ्यापूर्वी एसीची वाढती मागणी लक्षात घेता उत्पादक कंपन्या कमी वीज वापर, इन्व्हर्टर, आयओटी आणि एअर प्युरिफायर सारख्या ‘स्मार्ट’ वैशिष्ट्यांसह एसी बाजारात आणण्यासाठी स्पर्धा करत आहेत. त्यात एआय आणि वायफाय वर आधारित नवीन प्रकारच्या एसीलाही मागणी आहे. याशिवाय रेफ्रिजरेटर्स आणि कुलर यांसारख्या इतर उत्पादनांच्या विक्रीतही उत्पादकांना वाढ अपेक्षित आहे.
तापमानात दिवसेंदिवस वाढ
यंदा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासूनच तापमान वाढू लागल्याने मोठ्या प्रमाणात विक्रीची अपेक्षा आहे. एसी, कुलर आणि फ्रिज यांसारख्या उत्पादनांच्या खरेदीसाठी आधीच किरकोळ विक्रेते आणि खरेदीदारांमध्ये मागणी वाढण्याचे संकेत आहेत. यावर्षी उन्हाळा लवकर सुरू झाल्याने २०२४ मध्ये एकूण एसी विक्री २० टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. तर उन्हाळी हंगामात २५ टक्के वाढ अपेक्षित आहे असेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
कूलरची दुरुस्ती करणे, कारागीर सापडणे याशिवाय इतरही अडचणी जाणवू लागल्याने मध्यवर्गीयांकडून मागील दोन वर्षापासून एसीची मागणी वाढलेली आहे. वाढलेल्या मागणीमुळे बाजारात चैतन्य आहे. पुढील महिन्यात उन्ह चांगले तापले तर विक्री वाढणार आहे. हे निश्चित असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
भारनियमनाची टांगती तलवार
ग्रामीण भागातून कुलर, एसीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने अनेक धरणातील पाणी आटले आहे. त्यामुळे वीजनिर्मितीवर त्याचा परिणाम होऊन ग्रामीण भागातील भारनियमन आणखी वाढण्याची शक्यता आहे.