पुण्यनगरीत एकोणीसशे साठ-सत्तरच्या दशकात तीन-चार नाट्यसंस्था मोठ्या हिरीरीनं राज्य नाट्यस्पध त भाग घेताना दिसायच्या. त्यात “भरत नाट्यमंदिर’, “महाराष्ट्र कलोपासक’ आणि “प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’ या संस्थांचा हमखास समावेश असायचा. “भरत’चे दिग्दर्शन बाबुराव विजापुरे करीत. “कलोपासक’चे दिग्दर्शक राजा नातू असत आणि पी.डी.ए.च्या नाटकांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी संस्थेचे अध्यक्ष प्रा. भालबा केळकर यांच्याकडे असे; परंतु त्यावर्षी भालबासरांनी ही जबाबदारी त्यांचे एक शिष्योत्तम वासुदेव पाळंदे यांच्याकडे सोपवली आणि स्वतः केवळ अभिनेता म्हणून या स्पर्धेत उतरायचं असं ठरवलं. पाळंदेगुरुजी हे राजा परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले पी.डी.ए. या नाट्यसंस्थेतले एक उत्तम-जाणकार दिग्दर्शक म्हणून ओळखले जायचे. त्यांनी गोविंद बल्लाळ देवल या मान्यवर नाटककाराचं “संगीत शारदा’ हे नाटक स्पर्धेत उतरवयाचं ठरवलं आणि ते तयारीला लागले.
सुदेव पाळंदे हे पी.डी ए. मधल्या तरुण पिढीचे लाडके दिग्दर्शक. त्यांनी पात्रांची निवड करताना मनाशी एक निश्चय केला होता की “शारदा’ हेच नाटक करायचं पण संगीत नव्हे तर गद्य स्वरूपात. त्यांनी श्रीमंतांच्या अजरामर भूमिकेसाठी खुद्द भालबा केळकरांचीच निवड केली. कांचनभट या शारदेच्या वडिलांची भूमिका करण्यासाठी त्यांनी माझी निवड केली. अरविंद खाने यांना त्यांनी कोदंड केलं आणि खुद्द शारदेसाठी ना. सी. फडके या थोर साहित्यिकाची कन्या अंजली हिची निवड केली आणि शारदेची मैत्रिण वल्लरी हिच्या भूमिकेसाठी त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या सुहास काळेची निवड केली. तिचीच पुढं सुभाष जोशी या तरुणाबरोबर प्रेमविवाह करून सुहास जोशी झाली आणि तिनं आपल्या बावनकशी अभिनयानं सारी रंगभूमी-चित्रवाणी आणि हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी दणाणून टाकली. आज सुहास जोशी हे या कलाक्षेत्रातलं एक फार मोठं नाव मानलं जातं आणि मुख्य म्हणजे एक “सदाबहार’ असा तिचा या क्षेत्रात लौकिक आहे.
या सदरात यापूर्वी आलेल्या सई परांजपे आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमाणंच पुण्याची. सई प्रमाणं तीही फर्ग्युसन महाविद्यालयात शिकली. अर्थात, रोहिणी मात्र पुण्याच्याच एस.पी. महाविद्यालयात शिकली. पण या तिघीही “नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ या इब्राहिम अल्काझींच्या नवी दिल्ललीमधल्या नाट्यशाळेत शिकल्या हे खरं आहे. तिघीही हुशार. घरच्या बऱ्या. सुखवस्तू. त्यात सुहास आणि सई या पुण्याच्या डेक्ककन जिमखाना संस्कृती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात वाढल्या. लहानाच्या मोठ्या झाल्या, तर रोहिणी ही पुण्याच्या टिपिकल सदाशिवपेठी संस्कृतीतच बालपणापासून तरुणवर्गापर्यंत वावरली. या तिघी कन्यांनी आपापल्या परीनं या क्षेत्रात उत्तम कामगिरी पार पाडली आणि आमच्यासारख्या प्रत्यक्ष मूळ प्रवाहात नव्हे पण नजीकच्याच सरकारी माध्यमात वावरणाऱ्या मंडळींबरोबर चांगले-जिव्हाळ्याचे संबंध ठेवले. आज अनेक वर्षे या मान्यवर कलावतींच्या बरोबरचे आमचे स्नेहसंबंध टिकून आहेत.
त्या काळात “शारदा’ नाटकात शारदेच्या मैत्रिणीची ठसकेबाज भूमिका करणाऱ्या सुहासला मी कांचनभटाची भूमिका करताना तालमीत दररोज जवळपासच भेटत होतो. पुण्यामधल्या मुलांच्या भावे स्कूलजवळ असणाऱ्या एका इमारतीच्या खालच्या मजल्यावर आमच्या तालमी चालत. वयोवृद्ध झालेला एक वयस्क म्हातारा- “श्रीमंत’ सोळा वर्षांच्या शारदेबरोबर विवाह करायला निघतो. त्यावेळी शारदेच्या मैत्रिणी, वल्लरी या तिच्या मैत्रिणींच्या पुढाकारानं त्याची कशी टर उडवतात आणि “म्हातारा इतका अन् अवघे पाऊणशे वयोमान, दंताजीचे ठाणे उठले फुटले दोनही कान, भार वयाचा वाढून वाढून कंबर होय कमान… वगैरे सारं गाणं गद्यात गाऊन वल्लरीच्या भूमिकेत सुहास अशी काही धमाल करीत असे की पुढं फार मोठी नटी होणार, अभिनेत्री होणार, हे भविष्य वर्तवायला कुणा भविष्यवेत्त्याची खरं तर गरजच नव्हती. तरुण, देखणी उत्तम नकला करणारी वल्लरी सुहास इतक्या ठसक्यात उभी केली की तिला तिच्या 17-18 व्या वर्षी त्या वर्षींच्या राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाचं रौप्यपदक प्राप्त झालं आणि मग आजतागायतच्या यशात तिनं मागं वळून कधीच बघितलं नाही.
आज तिच्या करियरचा ग्राफ बघताना तिच्या बावनकशी अभिनय कौशल्याची वारंवार प्रचिती येताना दिसते आणि अभिनय क्षेत्राची ही अनभिषिक्त सम्राज्ञी मोठ्या डौलात या क्षेत्रात वावरताना बघून मोठं समाधानही लाभतं. अगदी अलीकडेच तिला “संगीत-नाटक अकादमी’ या मध्यवर्ती सरकारच्या संस्थेची फेलोशिप मिळाल्याचं ऐकून आपल्या सर्वांनाच खूप आनंद वाटला आणि तिच्या मेहनतीचं तिला फळ मिळालं याचंही समाधान मिळालं. तीही कधी कुणाच्या अध्यातमध्यात नसते. प्रसारमाध्यमांमध्येही ती फार क्वचितच दिसते. आपलं अभिनयाचं क्षेत्र बरं की आपला जोशी कुटुंबाचा संसार बरा. पण ज्यावेळी प्रा. भालबा केळकर यांचं निधन झालं त्यावेळी पौड रोडवर एका बंगल्यात श्रीराम लागू आणि सुहास जोशी यांचं कुठल्या तरी चित्रपटासाठी चित्रीकरण चाललं होतं. त्यावेळी मी पुण्यातच पंतप्रधान राजीव गांधी यांच्या एका कार्यक्रमाचं वृत्तांकन करण्यासाठी मुंबईहून आलो होतो. मी या उभयतांना भेटलो आणि त्यांनी भालबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅमेऱ्यावर दोन शब्द बोलावेत अशी विनंती केली होती. त्यावर “डॉक्टरांनी श्रद्धांजली वाहिली तर मी श्रद्धांजली देईन’ असा पवित्रा सुहास जोशींनी का कुणास ठाऊक घेतला होता आणि परिणामी दोघांनीही श्रद्धांजली वाहायला नकार दिला होता, असं मला आठवतंय.
त्यानंतर काही वर्षांनी दूरदर्शननं निर्मिती केलेल्या “स्मृतिचित्रे’ या दोन तासांच्या चित्रपटात सुहास जोशी यांच्याबरोबर त्यांच्या चित्रपटातल्या सासऱ्याची भूमिका करण्याचा योग आला. चित्रपटाचे निर्माते होते दूरदर्शनमध्ये निर्माते म्हणून काम करणारे विनायक चासकर आणि या चित्रपटाच्या दिग्दर्शिका होत्या विजया मेहता. सुहासनं लक्ष्मीबाई टिळकांची भूमिका वटवली होती. खूप छान. रेव्हरंड टिळक झाले होते रविंद्र मंकणी. मी सासऱ्याची भूमिका करीत होतो म्हणून मी विग न लावता (म्हणजे टक्कल न लावता) खरोखरीचा गोटा केला होता. त्याचवेळी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाचा संचालक म्हणून माझी नेमणूक झाल्यानं मला त्या पदावर रुजू व्हायचं होतं. गोटा केलेला मी त्या खुर्चीवर जाऊन बसलो. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला वाटायचं माझ्या घरी काही विचित्र तर घडलेलं नाही ना! दोन महिने त्याच अवस्थेत गेले. परंतु, यावेळी पुन्हा एकदा सुहास जोशीचा बावनकशी अभिनय जवळून बघता आला.
परवा संगीत-नाटक अकादमीनं तिचा गौरव करून तिला फेलोशिप बहाल केली, खूप आनंद आणि समाधान वाटलं, या अभिनेत्रीनं “बॅरिस्टर’, “नटसम्राट’, “घरोघरी’, “डॉक्टर तुम्हीसुद्धा’, “एकच प्याला’, “सख्खे शेजारी’, “आनंदी गोपाळ’, इत्यादी एकांहून एक सरस असणारी नाटकं केली. ही सारी व्यावसायिक नाटकं करताना “आपण बरं की आपलं काम बरं’ असा दृष्टिकोन ठेवूनच ती या क्षेत्रात वावरताना दिसली. मस्ती, खोडं वागणं तिनं कधीही केलं नाही आणि आपला पुणेरी बाणा आणि बाज कधी ढळू दिला नाही. “तेजाब’, “चॉंदनी’, “डॅडी’, “लव्ह’, “सातवॉं आसमान’, “तख्त’, “आतंक’, “हम हो गये आपके’, “सातच्या आत घरात’, “बालगंधर्व’ “अशोका’, “तू तिथं मी’, “मुंबई पुणे मुंबई’ असे किती हिंदी मराठी चित्रपट तिनं आपल्या अभिनयानं गाजवले आणि शासकीय तसंच खासगी- बिनशासकीय पारितोषिकं आणि पुरस्कारांची ती मानकरी ठरली.
तिनं “कुंकू’, “अग्निहोत्र’, “प्रपंच’ अशा किती मालिकांमध्ये उत्तम दर्जाचा अभिनय करून चित्रवाणीचा छोटा पडदाही गाजवत ठेवला. ती हौशी-प्रायोगिक रंगभूमीवर जितक्या सहजपणानं वावरलेली तेवढीच ती व्यावसायिक रंगभूमी- चित्रपट आणि मालिकांच्या क्षेत्रातही वावरते आहे. पुण्याच्या माणसाचं ठसकेबाज वागणं आणि मार्मिक स्वरुपाचं बोलणं सुहास आजही विसरलेली नाही, पुणं सोडून ठाण्यात स्थायिक झाल्यानंतर सुद्धा. पण आजही आपल्या परिचितांना ती विसरलेली नाही, एवढी मोठी नावाजलेली अभिनेत्री होऊनसुद्धा. मला वाटतं कदाचित हेच तिच्या यशाचं गमक असावं.
डॉ.विश्वास मेहंदळे