ट्राय दूरसंचार कंपन्यांकडे पाठपुरावा करणार
पुणे – बऱ्याच मोबाइल धारकांना कॉल ड्रॉपमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. याची जाणीव दूरसंचार नियामक प्राधिकरणाला म्हणजे ट्रायला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी ट्राय मोबाइल कंपन्यांकडे पाठपुरावा करीत असल्याचे ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी सांगितले.
“आम्ही फ्री व्हॉइस कॉल देत असल्यामुळे कॉल ड्रॉप बद्दल जास्त संवेदनाशील राहण्याची गरज नाही’, असा युक्तिवाद मोबाइल कंपन्यांकडून केला जातो. “मात्र, हा युक्तिवाद मान्य करता येण्यासारखा नाही’, असे शर्मा यांनी आशियाई विकास चर्चेवेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, मोबाइल कंपन्या “आम्ही व्हॉइस कॉल मोफत देत आहेत, त्यामुळे यामध्ये काही अडथळे आल्यास आम्हाला किती शिक्षा होणार’ असा व्यक्तिवाद करत आहेत. यावर शर्मा म्हणाले की, कोणी कोणाला काही मोफत देत नाही. इतर कामासाठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्या मोफत व्हॉईस कॉल (क्रॉस सबसीडी) देत आहेत याची आम्हाला जाणीव आहे.
कॉल ड्रॉपबाबत आम्ही कंपन्यांकडे विचारणा केली आहे आणि मोबाइल कंपन्या याबाबत योग्य त्या उपाययोजना करून ते प्रमाण कमी करतील, अशी आम्हाला आशा आहे. ट्रायचे अधिकारी विविध भागांत जाऊन मोबाइल सेवा कशी आहे याची चाचणी घेतात आणि सेवा अयोग्य असल्यानंतर त्यांना दंड करण्यात येतो. शर्मा यांनी सांगितले की, मोबाइल टॉवरचा आरोग्यावर परिणाम होत नसल्यामुळे नागरिकांनी टॉवर उभारणीसंबंधात सकारात्मक भूमिका घेण्याची गरज आहे.
5 जी सेवा योग्य वेळेत सुरू होईल…
भारतात इतर देशांप्रमाणेच 5 जी सेवा योग्य वेळात सुरू होतील, असे आर. एस. शर्मा यांनी सांगितले. यासाठी सरकार आपल्या परीने आवश्यक तो पुढाकार घेत आहे. दूरसंचार कंपन्यांनाही या संबंधात पायाभूत सुविधा उभारण्याचे काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.