नगर -माथाडी पतसंस्थाचे कर्ज, हफ्ते कपातीबाबत चर्चा होऊन माथाडी कामगारांचे पगारातून पतसंस्थांचे कर्ज हफ्ते कपात करण्यात यावेत, याबाबतचे आदेशावर स्वाक्षरी करून संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर आदेश राज्यातील माथाडी कामगार मंडळांना पारीत करण्याच्या सूचना ना. दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या. राज्यातील माथाडी कामगारांचे विविध प्रश्नाबाबत आ. संग्राम जगताप यांनी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुंबई येथे समक्ष भेट घेऊन चर्चा करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सहचिटणीस तथा अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत अध्यक्ष अविनाश घुले यांनी सांगितले.
मार्च 2019 मध्ये लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याअगोदर शासन निर्णय होऊन माथाडी कामगारांचे पगारातून माथाडी पतसंस्था, बॅंका यांचे कर्ज हफ्ते कपात करण्याचे बंद केले. या निर्णयामुळे माथाडी कामगार आर्थिक अडचणीमध्ये आला व परिणामी खासगी सावकारांच्याकडे जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. मात्र शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी जनता यांचेशी नाळ असणारे आघाडी सरकार खा. शरद पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थापन झाल्यानंतर खा. पवार यांनी पुण्यात डॉ. बाबा आढाव यांची समक्ष भेट घेऊन माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत संबंधित खात्यांचे मंत्री व अधिकारी यांची बैठक घेतली.
माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत आ. संग्राम जगताप यांचे सहकार्याने सतत पाठपुरावा केल्यामुळे माथाडी पतसंस्थांचे कर्ज हफ्ते कपात करण्यासंदर्भातील निर्णय मार्गी लावल्याचे समाधान मिळाल्याचे अविनाश घुले यांनी सांगितले. तसेच राज्य माथाडी सल्लागार मंडळांची नियुक्ती करण्यात यावी, स्थानिक माथाडी मंडळावर स्थानिक हमाल मापाडी प्रतिनिधी नियुक्त करण्यात यावेत.
शासकीय धान्य गोदामातील मजुरीमधून टी.डी.एस कपात करण्यात येऊ नये. राज्यातील माथाडी मंडळांना जी. एस. टी टॅक्समधून वगळण्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात यावा आदी प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांना निवेदन दिलेले असल्याचे अविनाश घुले यांनी सांगितले.