रेडा-लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्याचा शेतजमीन गट नंबर 795 मधील 30 गुंठे क्षेत्रातील ऊस भावकीतील पूर्ववैमनस्यातील भांडणातून पेटवून दिल्याची घटना नुकताच घडली आहे. यामध्ये ऊस, ठिबक पाईप जळून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत बावडा पोलीस चौकीत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील बबन रामचंद्र खाडे हे नीरा भीमा कारखान्याच्या शेजारील परिसरात राहत आहेत. त्यांच्या उपजीविकेचे साधन शेती आहे.ते शेतीवरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांच्या शेतातील 16 महिन्याचा खोडवा ऊस पीक होते.
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ते आपल्या शेतात जात असताना अचानक त्यामधून धूर निघत असल्याचे दिसून आले. त्या वेळी एक गुंठाभर ऊस पेटलेला दिसला. त्यावेळी भावकीतील बाळासाहेब धोंडीबा खाडे व त्यांचा मुलगा अजिंक्य बाळासाहेब खाडे हे तेथून पळून जात असताना त्यांना दिसले. त्यावेळी मी तुम्हाला ओळखले आहे, असे बबन खाडे म्हणाले. त्यावर मीच तुमचा ऊस पेटवला आहे. राहिलेल्या क्षेत्रातीलही ऊस पेटवून देणार आहे.तुला काय करायचे ते कर, असे म्हणून बाळासाहेब धोंडीबा खाडे तेथून निघून गेले. त्यानंतर बबन खाडे यांनी उसाला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु चारही बाजूंनी आग लागल्याने आटोक्यात आणणे शक्य नव्हते. त्यामुळे सर्व ऊस जळून खाक झाला आहे. अशा आशयाची फिर्याद खाडे यांनी बावडा पोलिस चौकीत दिली आहे.