भवानीनगर – इंदापूर तालुक्यात तीन साखर कारखाने आहेत. सध्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याकडे 6 लाख 95 हजार किंवटल साखर शिल्लक आहे. त्या साखरेची किंमत सव्वा दोनशे कोटी रुपये होत आहे. केवळ साखरेला उठाव नसल्याने ही साखर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकली जात नसल्यानेच श्री छत्रपती कारखान्याचे सव्वा दोनशे कोटी रुपये अडकून पडलेले आहेत.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना हा आर्थिक अडचणीत सापडला आहे, असे वारंवार बोलले जात असले तरीदेखील ज्या काही साखर कारखान्यांच्या पुढे अडचणी आहेत. या अजूनही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. यामध्ये प्रामुख्याने श्री छत्रपती साखर कारखान्याकडे आजपर्यंत 6 लाख 95 हजार किंवटल साखर शिल्लक आहे. सन 2017-18 यावर्षीची साखर 1 लाख 78 हजार किंवटल, तसेच 2018-19 या वर्षाची चार लाख 1 हजार किंवटल व 2019-20 ची उर्वरित साखर असे मिळून सहा लाख 95 हजार किंवटल साखर आज कारखान्याकडे शिल्लक आहे.
ज्या देशांमध्ये अंतर्गत साखरेचा खप आहे. साधारण 260 लाख मेट्रिक टन या साखरेच्या खपामधे कुठलीही वाढ झाली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देशांतर्गत साखर बाजारापेक्षा साखरेचे दर हे 1900 ते 2300 रुपये प्रति क्विंटल दर राहिले. परिणामी साखरेची निर्यात शासनाच्या अनुदान रुपी मदतीवर अवलंबून आहे. याचा परिणाम म्हणून कारखान्यात दरमहा केंद्र शासनाकडून जरी कोठा ठरवून येत असला तरी व्यापाऱ्यांकडून साखरेला मागणी नाही. त्यामुळे कारखान्यास दोन ते तीन वर्षाचे व्याज नाहक भरावे लागत आहे. हे व्याज तीन वर्षांनी अंदाजे 900 रुपये प्रतिकिंवटल, दोन वर्षासाठी सहाशे रुपये प्रतिकिंवटल, तर एक वर्षासाठी तीनशे रुपये प्रतिकिंवटल एवढे व्याज या साखरे वरती भरावे लागत आहे.
या सर्व गोष्टींमुळे साखर कारखानदारी अडचणीत सापडत आहे. याचेच दुष्परिणाम म्हणजे ऊस उत्पादक सभासदांना एफआरपी एक रकमी देता येत नाही. कामगारांचे पगार वेळेत देणे होत नाही. याच प्रमाणे दैनंदिन कामकाजामध्ये देखील आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. अशाप्रकारे सद्यस्थिती कारखान्याची आहे.
यातून मार्ग काढायचा असेल तर ही शिल्लक साखर (एफएसपी) न्यूनतम साखर विक्री चा दर हा 3100 रुपयांवरून 3500 रुपये केला तरच हा खर्च भरून निघण्यास मदत होणार आहे. एकूण साखर उत्पादनापैकी 25 ते 35 टक्क्यांपर्यंत ही साखर सर्वसामान्य जनतेला वापरासाठी उपयोग होती. मात्र 60 ते 65 टक्के साखर ही मिठाई, शीतपेय हे बनवण्यासाठी वापरली जाते. त्यासाठी केंद्र सरकारने ही साखर 40 ते 45 रुपये विक्री करण्याचे धोरण ठरवावे जेणेकरून मोडखळीस आलेला साखर व्यवसाय पुन्हा चांगल्या सुस्थितीत येईल.
साखर विकली तरच होईल अडचण दूर
साखर कारखान्याच्या बाबतीत एफआरपी पासून ते इथेनॉल निर्मिती पर्यंत तसेच इतरही काही गोष्टींचे दर हे केंद्र व राज्य सरकार ठरवत असते. केंद्र सरकारच्या नियमानुसार न्यूनतम साखर विक्रीचा दर प्रति किंवटल 3100 रुपये असल्याने त्या ठरवून दिलेल्या रकमेच्या आत साखर कारखान्यांना साखर विक्री करता येत नाही. त्यामुळे कारखान्यांमध्ये साखर शिल्लक असूनही साखर विकता येत नाही. सव्वा दोनशे कोटी रुपये किमतीची साखर कारखान्यात शिल्लक आहे. ही साखर विकली गेली तर श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण भासणार नाही. त्यातच सध्या देशापुढे करोनाचे मोठे संकट उभे आहे. या संकटामुळे शीतपेय बनवण्यासाठीही साखर जात नसल्याने सध्या देशामध्ये पंचवीस लाख मेट्रिक टनाचा साखरेचा खप कमी झालेला आहे.