ज्या प्रमाणं आपण आपल्या देशाचं स्वातंत्र्य, प्रसंगी आपल्या प्राणांचीही किंमत देऊन, जपायला हवं; ज्या प्रमाणं आपल्या पर्यावरणाचं संगोपन करायला हवं, आपला सांस्कृतिक वारसा जपायला हवा त्याच प्रमाणं कलाक्षेत्राला ठसठशीत स्वरुपाची मदत करून आपलं सांस्कृतिक जीवन समृद्ध करायला साहाय्य करणाऱ्या कलावंतांनाही आपण खूप निगराणीनं जपायला हवं. त्यांना वाऱ्यावर सोडून देता कामा नये. तसं कुणी करीत असेल तर ते सामाजिक पाप मानायला हवं. अशा असंख्य कलावंतांबद्दल बोलायला हवं, लिहायला हवं, त्यांचं समाजामधलं महत्त्व आणि सामाजिक चळवळीमधलं महत्त्वाचं स्थान सरकारला आणि जनसामान्यांना वारंवार पटवून द्यायला हवं. कारण ही समाज आणि समाजमन घडवणारी माणसं. त्यातही महिला-कलावंत खूप मोठ्या प्रमाणात कलाक्षेत्रात योगदान देत असतात हे कधी विसरून चालणार नाही. त्यातल्याच काही महिला-कलाकारांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेण्यासाठी हे सदर- हे लेखन.
या महिला-कलावतीत प्रकर्षानं आणि खरं तर पहिल्या क्रमांकाचं स्थान दिसतं ते ज्येष्ठ लेखिका-दिग्दर्शिका सई परांजपे या अतिशय बुद्धिमान सर्जनशील अशा कलावतीचं. “अशी सई पुन्हा न होणे’ हे केवळ शीर्षकच नाही, तर ती एक वस्तुस्थिती आहे. बीस्टार रॅंग्लर पदवी प्राप्त, फर्गसन महाविद्यालयाचे एकेकाळचे प्राचार्य आणि परदेशी कपड्यांची होळी केली म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांना फर्गसन कॉलेजमधून रस्टीकेट करणारे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांची नात, एकेकाळी राज्यसभा सदस्य असणाऱ्या मान्यवर सामाजिक कार्यकर्त्या शकुंतला परांजपे यांची कन्या सई परांजपे, घराण्याची प्रचंड मोठी पार्श्वभूमी घराणं खूप मोठं. सईचे पिताश्री हे रशियन होते. आजोबा गणिती होते. पण आपल्या घराण्यातली गणिताची ती उज्ज्वल परंपरा बाजूला ठेवून सईनं आपलं फर्गसन महाविद्यालयातलं, कला शाखेचं शिक्षण संपवलं आणि पुणे आकाशवाणी केंद्रात निवेदिकेची नोकरी पत्करली. ऐकोणीसशे पन्नासच्या दशकात ती निवेदिका झाली. त्या काळात “आकाशवाणी’ हे खूपच आकर्षणाचं माध्यम होतं. तिच्याबरोबर गोपीनाथ तळवळकर, विद्या बाळ, पोलीस अधीक्षक सोमण यांच्या पत्नी अशी एकेक दिग्गज मंडळी होती.
त्या काळात पुण्यात प्रा. भालबा केळकर, डॉ. श्रीराम लागू, तारामती घारपुरे, जयंत धर्माधिकारी, वासुदेव पाळंदे अशा काही मान्यवरांनी एकत्र येऊन “प्रोग्रेसिव्ह डॅमॅटिक असोसियशन’ या नावाची प्रयोगिक नाटकं करणारी संस्था स्थापन केली होती. या संस्थेत सई परांजपे आणि अरुण जोगळेकर असे दोन उत्तम कलाकारही त्या काळात सामील झाले होते. बाकी अनेक मान्यवर होते. आज खूप नाव कमावलेली डॉ. जब्बार पटेल आणि डॉ. मोहन आगाशे यांच्यासारखी कलावंत मंडळीही होती. त्या संस्थेत मीही सामील झालो होतो. या संस्थेच्या कार्यकारिणीचा एक सदस्य म्हणून मी त्या काळात कार्यरत होतो. याच काळात संस्थेनं पु. ल. देशपांडे लिखित “सारं कसं शांत शांत’ या नावाची एक विनोदी एकांकिका बसवली होती. त्यात अरुण जोगळेकर नायक आणि सई परांजपे नायिका अशी जोडी होती. ती एकांकिका खूप गाजली आणि या दोघांची मैत्रीही आणि कालांतरानं हे दोघं विवाहबद्ध झाले.
त्यांना दोन मुलं झाली. एक मुलगी अश्विनी (विनी) आणि मुलगा गौतम. विनीचं लग्न होऊन ती तिच्या घरी आहे आणि गौतम आई-वडिलांच्या प्रमाणंच कलाक्षेत्रात कधी अभिनय, कधी दिग्दर्शन, कधी दोन्हीही अशी वाटचाल करून स्थिरावण्याचा प्रयत्न करतो आहे. याच नव्हे, तर कुठल्याही क्षेत्रात स्थिर होताना आई-वडिलांची पुण्याई आणि कामगिरी कामी येतंच असं नाही. पण गौतमचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. त्यातही त्याला सध्या चित्रवाणी मालिकांमध्येही बऱ्यापैकी संधी मिळताना दिसते आहे. दरम्यानच्या काळात अरुण एकीकडे आणि सई दुसरीकडे अशा प्रकारे ते मुंबईत वास्तव्य करू लागले. अधूनमधून एकेमेकांना भेटत. मुलांची जबाबदारी उभयतांनी वाटून घेतली. या साऱ्या तणावपूर्ण वातावरणात दोघंही कलेची सेवा करण्यात रममाण झालेली बघायला मिळायची. खरं तर अशा वातावरणात रंगभूमी-चित्रपट-चित्रवाणी अशा झळाळीच्या क्षेत्रात काम करीत राहणं तसं खूप अवघड असतं. पण दोघांनीही खास करून सईनं या साऱ्या तणातणीच्या वातावरणावर मात करीत आपल्याला हवं ते केलेलं दिसतं. शेवटी यासारखं दुसरं काही नसतं.
सईनं काही काळ दिल्लीच्या इब्राहिम अलकाझी यांच्या नाट्यशाळेत “नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये राहून 3 वर्षांचं प्रशिक्षण पूर्ण केलं. अरुणनंही हा कोर्स केला. सईनं दिल्लीच्या दूरदर्शन केंद्रात आणि अरुणनं “स्पॉंज ऍन्ड ड्रामा डिव्हिजन’ या केंद्र सरकारच्या खात्यात नोकरी केली. परंतु उभयतांचे स्वभाव हे मुळातच नोकरी करण्याचे नव्हते. ते दिल्लीत नाटकं बसवित. त्यामुळे त्यांचा आणि माझा अधिक परिचय झाला. कारण मीही त्या काळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून बातम्या देण्याची नोकरी करायचो. मी काय, नाटककार गो. पु. देशपांडे काय, मुकुंद नाईक, दया डोंगरे काय अशी काही, नाटकवेडी मंडळी सई आणि अरुण यांनी स्थापन केलेल्या “नाट्यद्वयी’ नामक नाट्यसंस्थेत काम करायचो. अच्छा खासा, कैसी यह जोडी मिलाये मोरे राम, अशी कितीतरी नाटकं केली. बहुधा सईच अशा नाटकांचं दिग्दर्शन करायची क्वचित ती भूमिकाही करायची. परंतु, दिग्दर्शन करताना ती विविध पात्रांची रूपं जी तालमीत आमच्या समोर उभी करायची त्यातून तिच्या अभिनय कौशल्याची चुणूक सहज लक्षात यायची. तिचा मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांचा रितीरिवाजांचा बारकाईनं केलेला अभ्यास जाणवयाचा. तरीही सईची झेप एवढी मोठी असं तिच्या अत्यंत साध्या वागण्यामुळं कधी फारसं जाणवायचं नाही. ती इतर भूमिकांचा अभिनय करून दाखवायची किंवा प्रसंग समजावून द्यायची तेव्हा तिच्या हुशारीची आणि खरंतर “गणिती बाण्याची’ ही कल्पना यायची, ती गणित शिकलेली नव्हती तरीही.
आज मागं वळून बघताना आणि सई ऐंशी-ब्याऐंशी वर्षांची झालेली असताना गौर वर्णाची- निळ्या डोळ्यांची आणि इतकं सारं जग बघूनही आपलं “पुणेरीपण’ अबाधित ठेवणारी सई बघितली की, हीच का ती सई जिनं आजवर “नांदा सौख्यभरे “एक तमाशा अच्छा खासा’, “कैसी यह जोडी मिलाये मोरे राम’, सख्खे शेजारी, जास्वंदी, अलबेल अशा सारख्या एकाहून एक नाट्यकलाकृती लिहिल्या आणि सादर केल्या. सामाजिक भान बाळगून. स्त्रीत्वाचा टेंभा मिरवला नाही. कुठल्याही वादात स्वतःला गोवून घेतलं नाही. घरच्या श्रीमंतीची मस्ती केली नाही. बुद्धिमत्तेची मिजास दाखवली नाही. परंतु कधी “कथा’, तर कधी “स्पर्श’, तर कधी “अंगुठा छाप’, तर कधी “चष्मेबद्दूर, तर कधी “साज’, तर कधी “दिशा’, तर कधी “कॅप्टन लक्ष्मी’, तर कधी “चकाचक’ असे सामाजिक जाणिवांचे चित्रपट दिले. “सिकंदर’ हा एका छोट्या कुत्र्याच्या जीवनावर विविध अंगांनी भाष्य करणारा चित्रपट सईचा मुलांविषयीच्या मानसशास्त्राचीही जाणीव करून देताना दिसतो. सुदैवानं मला या चित्रपटात सईच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली होती. नाट्यलेखन, दिग्दर्शन, अभिनय, त्याचबरोबर चित्रपट निर्मिती- दिग्दर्शन यात खरोखरीच “पहले पायदान पर’ असणारी ही आमचे ज्येष्ठ मैत्रिण नव्हे पण परिचित. चित्रवाणी मालिकांवरही तिनं हुकमत गाजवली होती हे नाकारता येणार नाही. पद्मभूषण, फिल्मफेअरसह अनेक पुरस्कारांनी ती सन्मानीत आहे.
आजही सई काही ना काही तरी करतेच आहे. कधी आठवणीवर आधारित एखादं सदर लिहिताना दिसते, तर कधी “सय’ सारखं एखादं पुस्तक लिहिताना दिसते. सर्जनशील कलाकार हा समाजाचं मनोरंजन करताना प्रबोधनाचंही भान ठेवीत असतो. सईनं आपल्या कलाकृती सादर करताना तसा आव कधी आणला नाही पण ती सतत आपल्या कलानिर्मितीतून समाजाचं दर्जेदार मनोरंजन आणि प्रबोधन करताना बघायला मिळते आहे. म्हणून तर म्हटलं की देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, पर्यावरण जोपासण्यासाठी ज्याप्रमाणं अविरत परिश्रम करायला हवेत त्याचप्रमाणं सई परांजपे यांच्यासारख्या विदुषीही समाजानं प्राणापलिकडे जपायला हव्यात.
डॉ. विश्वास मेहेंदळे