पिंपरी – विद्यार्थ्यांनी आयुष्यात शिक्षण कोणत्याही परिस्थितीत थांबू नये. चुकीचे पाऊल पडेल असे वागू नका. विद्यार्थ्यांनी पालकांशी व पालकांनी विद्यार्थ्यांशी संवाद ठेवणे गरजेचे आहे. जीवन जगत असताना अनेक प्रलोभने व अडचणी येतील त्यावेळी खंबीरपणे त्या अडचणींना व संकटांना सामोरे जा. विद्यार्थी दशेत असताना आई-वडिलांनी जो आपल्यावर विश्वास ठेवला आहे त्यांचा विश्वासघात करू नका, असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे-पाटील यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त थेरगाव, संतोषनगर येथील संतोष मंगल कार्यालयात गुणगौरव समारंभ झाला. या कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती देवीचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अजित प्रतिष्ठानचे विश्वस्त अभय मांढरे, माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, माजी नगरसेविका माया बारणे, सचिन बारणे, सुजाता बारणे, विराज बारणे, बाळासाहेब तनपुरे, योगेश साळुंखे, हेमराज बाविस्कर, संजय काटे, नारायण केसवड, भाऊ पवार, अनिल बोरकर, अखिल भाई शेख, मोहन भोसले, हनुमंत मोरे, निलेश स्वामी आदी उपस्थित होते. इरशाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त लोकांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदत देण्यात आली. थेरगाव परिसरातील 759 दहावी, बारावी, डॉक्टर, वकीलीची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला.
माजी नगरसेविका माया बारणे म्हणाल्या, छत्रपती शिवरायांचा संत तुकारामांचा संत ज्ञानोबांचा भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात प्राण्यांची आहुती देणाऱ्या क्रांतीची व स्वाभिमानाची अग्नि कुंडे पेटवणारा कृतिशील विचारवंत व समाजसुधारकांचा महाराष्ट्र. महाराष्ट्रात भक्ती आणि शक्तीची अपूर्व अशी परंपरा आहे. या महाराष्ट्राने देशाच्या राजकारणात अनेक नेते घडविले त्यापैकी सध्या जनतेशी व मातीशी नाळ जोडणारा नेत्या म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाहिले जात आहे.
कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका माया बारणे, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संयोजक-जय गणेश नागरी सहकारी पतसंस्था, प्रगती शिक्षण संस्था, श्रीमंत छत्रपती शिवाजी तरुण मंडळ. सूत्रसंचालन- सोमनाथ नाडे सर यांनी केले. ऋषिकेश काशीद यांनी आभार मानले.